Pahalgam Attack – पहलगाम येथीलदहशतवादी हल्ल्याचा तपास रशिया किंवा चीनच्या तपास संस्थांकडून करण्यात यावा, अशी पाकिस्तानची अपेक्षा आहे. अशा आशयाचे एक वृत्त काही प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीमध्ये ही अपेक्षा व्यक्त केल्याचे वृत्त रशियातल्या आरआयए नोवास्ती या सरकारी वृत्तसंस्थेने प्रसिद्धीस दिले आहे. रशिया, चीन किंवा अगदी पाश्चात्य देशही या संकटात खूप सकारात्मक भूमिका बजावू शकतात. ते एक तपास पथक स्थापन करू शकतात. ज्यांना या हल्ल्याचा तपास करण्याचे काम सोपवले पाहिजे. जेणेकरून भारत किंवा मोदी खोटे बोलत आहेत की ते खरे बोलत आहेत याची चौकशी करता येईल. आंतरराष्ट्रीय पथकाला हे शोधू द्या, असे आसिफ यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनीही आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे ते म्हणाले. भारतात, काश्मीरमध्ये या घटनेचा गुन्हेगार आणि सूत्रधार कोण आहे ते शोधून काढूया, बोलणे किंवा रिकाम्या विधानांचा काहीही परिणाम होत नाही. पाकिस्तानचा सहभाग असल्याचे किंवा या लोकांना पाकिस्तानने पाठिंबा दिला होता याचे काही पुरावे असले पाहिजेत. ही फक्त विधाने आहेत आणि आणखी काही नाही, असे ख्वाजा यांनी म्हटले असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. दोन वक्तव्यांमधील विसंगती… दरम्यान, पाकिस्तानने केवळ भारताचा आरोप नाकारला नाही, परंतु उच्च अधिकाऱ्यांनी आश्चर्यकारकपणे स्वतःला बदनाम करणारे दोन दावे केले आहेत, असे मॉस्कोस्थित स्वतंत्र अमेरिकन विश्लेषक अँड्र्यू कोरीब्को यांनी नमूद केले. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम जिल्ह्यात हल्ले करणारे स्वातंत्र्यसैनिक असू शकतात, अशी टिप्पणी केली होती. काश्मीरबद्दल काहीही मत असले तरी हा हल्ला दहशतवादी हल्ला होता, हे निश्चित आहे, त्यामुळे दहशतवादाचे समर्थनच इशाक दर यांनी केले आहे. दुसरीकडे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी जे काही झाले, ते चुकीचे फ्लॅग ऑपरेशन असावे असे म्हटले होते. या दोघांच्या वक्तव्यातून विसंगतीच दिसून येते. असे कोरीब्को म्हणाले.