Devendra Fadnavis : मिरा रोड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करून अमराठी लोकांनी आयोजित केलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. तरीही मनसे आपल्या भूमिकेवरून ठाम होती. आज ८ जुलै रोजी हा मोर्चा होणार होता. मात्र, पोलिसांनी मोठी कारवाई करत पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. मनसैनिकांना तरीही मिरा रोडवर आक्रमक पवित्रा घेत सरकारविरोधी घोषणाबाजी केली. यानंतर या भागात जमावबंदीचे आदेश पोलीस आयुक्तांनी लागू केले. मनसे पदाधिकारी आंदोलनावर ठाम असल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी धरपकड झाली. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या अनेकांना ताब्यात घेतले आहे. यामुळे आता मनसेच्या मोर्चावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मनसेच्या मोर्चाला परवानगी का देण्यात आली नव्हती, याचे कारणही त्यांनी सांगितले आहे. या मोर्चावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाबाहेरून माध्यमांना प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मिरा भाईंदरमध्ये मनसेकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. स्पेसिफिक अशा रुटचा आग्रह पोलीस आयुक्तांनी मला सांगितलं की, जो रूट दिला त्या रूटवर जुना मोर्चा निघाला त्यांनी कुठल्याही रुटचा आग्रह केला नव्हता. मनसेने स्पेसिफिक अशा रुटचा आग्रह केला. जिथे मोर्चा काढणं कठीण आहे, असा रुट मागण्यात आला होता, अशी माहिती फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तुम्हाला काय उडचण होती? या मोर्चावरून राजकारण तापले असून परिवहन मंत्री आणि शिंदेसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. व्यापारांना मोर्चा काढायला परवानगी देता मग मराठी एकीकरण समिती मोर्चा काढत होती, तुम्हाला काय उडचण होती? असा थेट सवाल त्यांनी पोलिसांना केला आहे. यामुळे महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत, असेही प्रताप सरनाईक यावेळी बोलताना म्हणाले. हेही वाचा : ‘भारतीयांचे अपहरण करून बांगलादेशात ढकलले?’ ; किरेन रिजिजू यांच्या विधानाला असदुद्दीन ओवैसींचे उत्तर