Team India : टीम इंडिया मुंबईत नाही, थेट दुबईत एकत्र येणार! आशिया कपसाठी काय आहे संघाची नवी रणनीती? जाणून घ्या

Team India Assemble in Dubai for Asia Cup 2025 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील १५ खेळाडूंचा भारतीय क्रिकेट संघ ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० आशिया चषक २०२५ साठी ४ सप्टेंबरला दुबईत एकत्र येणार आहे. नेहमीच्या परंपरेपासून वेगळे जाऊन खेळाडू आपापल्या शहरांतून थेट दुबईत पोहोचतील आणि तिथे संघाशी जोडले जातील. यापूर्वी संघ सहसा मुंबईत एकत्र येऊन सामूहिकपणे रवाना होत असे. ही नवी व्यवस्था खेळाडूंच्या प्रवास सुविधा आणि लॉजिस्टिक्सच्या सोयीसाठी लागू करण्यात आली आहे.
पहिले सराव सत्र ५ सप्टेंबरला –
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले, “सर्व खेळाडू ४ सप्टेंबरच्या सायंकाळपर्यंत दुबईत पोहोचतील. पहिले नेट सराव सत्र ५ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अकादमीत होईल. लॉजिस्टिक सुविधांचा विचार करता खेळाडूंना त्यांच्या शहरांतून थेट दुबईत पोहोचण्यास सांगण्यात आले आहे.”
काही खेळाडू मुंबईहून रवाना होतील –
त्यांनी पुढे स्पष्ट केले, “काही खेळाडू मुंबईहून रवाना होतील, पण काहींना असे वाटते की आधी मुंबईत येऊन मग दुबईला जाणे अव्यवहार्य आहे. शिवाय, इतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या तुलनेत दुबईला पोहोचण्यास कमी वेळ लागतो.” टीम इंडिया आपला पहिला सामना १० सप्टेंबरला संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध खेळेल, त्यानंतर १४ सप्टेंबरला दुबईत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होईल. सुपर फोर टप्प्यापूर्वी भारताचा तिसरा गट सामना १९ सप्टेंबरला ओमानविरुद्ध होईल.
हेही वाचा – Asia Cup 2025 : आशिया कपसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर; चरिथ असलंका करणार नेतृत्व!
दुलीप करंडकातील खेळाडूंचे काय?
भारतीय संघातील अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा सध्या गुरुवारपासून सुरू झालेल्या दुलीप करंडक उपांत्यपूर्व फेरीत उत्तर विभागाकडून पूर्व विभागाविरुद्ध खेळत आहेत, तर कुलदीप यादव मध्य विभागाकडून ईशान्य विभागाविरुद्ध खेळत आहे. स्टँडबाय खेळाडूंमध्ये असलेले प्रसिद्ध कृष्णा किंवा वॉशिंग्टन सुंदर मुख्य संघासोबत नेट गोलंदाज म्हणून प्रवास करतील का, असे विचारले असता अधिकाऱ्याने यास नकार दिला.





