रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षातच टाटा समूहाला घरघर; बसला मोठा फटका

नवी दिल्ली : रतन टाटा यांच्या निधनानंतर अवघ्या एका वर्षात टाटा समूहाच्या कंपन्यांच्या समभागांचे एकत्रित बाजारमूल्य तब्बल २१ टक्क्यांनी घसरले असून, यामुळे समूहाला ७ लाख कोटी रुपयांहून अधिकचा फटका बसला आहे. गेल्या वर्षी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी रतन टाटा यांचे निधन झाले. त्यानंतर जागतिक आर्थिक अस्थिरता, मंदावलेली मागणी आणि समूहातील कंपन्यांपुढील वैयक्तिक आव्हानांमुळे ही मोठी घसरण नोंदवली गेली आहे.
अहवालानुसार, टाटा समूहाच्या २३ सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य गेल्या वर्षीच्या ३३.५७ लाख कोटी रुपयांवरून २६.३९ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे.
सर्वाधिक घसरण कोणत्या कंपन्यांमध्ये?
टाटा समूहातील तेजस नेटवर्क्सच्या समभागांना सर्वाधिक फटका बसला असून, त्यांचे समभाग ५० टक्क्यांहून अधिक घसरले. यानंतर ट्रेंटचे समभाग ४४ टक्के, टाटा टेक्नॉलॉजीज ३३ टक्के, तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टीसीएसचे समभाग २९ टक्क्यांनी खाली आले. टाटा एलेक्ससी आणि टाटा मोटर्स प्रत्येकी २८ टक्के, ओरिएंटल हॉटेल्स आणि टीआरएफ २४ टक्के, व्होल्टास २३ टक्के, टाटा केमिकल्स १८ टक्के आणि टाटा पॉवर १६ टक्क्यांनी घसरले. टाटा कम्युनिकेशन्स आणि नेल्कोचे समभागही १३ टक्क्यांनी खाली आले.
कोणत्या कंपन्यांनी केली प्रगती?
सर्वत्र घसरणीच्या वातावरणात काही कंपन्यांनी मात्र चांगली कामगिरी केली. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे समभाग ४१.३ टक्क्यांनी वधारले. बनारस हॉटेल्स १४.५ टक्के, टाटा स्टील ८.१ टक्के, द इंडियन हॉटेल ५.२ टक्के आणि टायटन कंपनीचे समभाग २.१ टक्क्यांनी वधारले.
आर्थिक अस्थिरतेचा परिणाम
जागतिक आर्थिक अशांतता आणि मंदावलेल्या मागणीमुळे टाटा समूहासमोरील आव्हाने वाढली आहेत. तज्ज्ञांच्या मते, समूहातील कंपन्यांमधील वैयक्तिक समस्यांमुळेही ही घसरण झाली आहे. तरीही, टाटा समूहाच्या काही कंपन्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही चांगली कामगिरी करत भविष्यातील आशा कायम ठेवल्या आहेत.





