‘टाटा समूहाच्या सर्वात काळ्या दिवसांपैकी एक…’ ; अहमदाबाद विमान अपघातावर अध्यक्ष चंद्रशेखरन यांचे सहकाऱ्यांना पत्र

Tata Chairman Chandrasekaran । एअर इंडियाचे एआय-१७१ विमान अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. हे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान अहमदाबादमधील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाशी आदळले आणि मोठ्या स्फोटासह आगीच्या गोळ्यात रूपांतर झाले. एअर इंडिया टाटा समूहाद्वारे चालवले जाते. दरम्यान , याच अपघातांवर आता टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी आपल्या सहकाऱ्यांसाठी एक पत्र लिहिले आहे. यामध्ये ते अत्यंत भावनिक झाल्याचे दिसून येत आहे.
१२ जून समूहाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस
टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये १२ जून हा समूहाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 या विमानाच्या भयानक अपघातानंतर ही प्रतिक्रिया आली आहे, ज्यामध्ये २४२ लोकांचा मृत्यू झाला होता. जानेवारी २०२२ मध्ये टाटा समूहाने एअर इंडियाचे अधिग्रहण केले.
चंद्रशेखरन यांनी आपल्या पत्रात, “काल जे घडले ते अविश्वसनीय आहे आणि आपण सर्वजण धक्का आणि दुःखात आहोत. एकाही व्यक्तीला गमावणे हे खूप दुःखद आहे, परंतु इतक्या मोठ्या संख्येने एकत्रितपणे जीव गमावणे असह्य आहे. टाटा समूहाच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस आहे.” असे म्हटले.
टाटा समूह तपासात पूर्ण सहकार्य करेल Tata Chairman Chandrasekaran ।
त्यांनी अपघाताविषयी माहिती देताना,”गेल्या २४ तासांत भारत, ब्रिटन आणि अमेरिकेतील तपास संस्थांचे पथक अहमदाबादला पोहोचले आहेत आणि अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. “असे म्हटले. तसेच त्यांनी आश्वासन दिले की, “टाटा समूह तपासात पूर्ण सहकार्य करेल आणि जे काही तथ्य समोर येईल ते पारदर्शकतेने सर्वांसमोर मांडले जाईल.”
चंद्रशेखरन म्हणाले, “जेव्हा आम्ही एअर इंडियाचे कामकाज हाती घेतले तेव्हा आम्ही प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले. यामध्ये कधीही तडजोड केली गेली नाही. जोपर्यंत आम्ही सर्व तथ्यांची पुष्टी करत नाही तोपर्यंत आम्ही कोणतेही सार्वजनिक गृहीतके लावणार नाही, परंतु प्रत्येक तथ्य पूर्ण पारदर्शकतेने शेअर करू.”
अपघातातील मृतांची संख्या २६५ वर Tata Chairman Chandrasekaran ।
एअर इंडियाचे एआय-१७१ विमान अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. हे बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान अहमदाबादमधील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाशी आदळले आणि मोठ्या स्फोटासह आगीच्या गोळ्यात रूपांतर झाले. एअर इंडिया टाटा समूहाद्वारे चालवले जाते. विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते, ज्यात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. फक्त एका व्यक्तीला जिवंत वाचवता आले. विमान वसतिगृहाच्या इमारतीशी आदळल्याने अपघातातील मृतांची संख्या २६५ वर पोहोचली आहे, ज्यामध्ये निवासी डॉक्टर देखील उपस्थित होते.
सध्या, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथके पोहोचली आहेत आणि विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी अधिकृत तपास सुरू केला आहे. एअर इंडियाने अपघाताच्या कारणाबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट विधान दिलेले नाही, परंतु पीडित कुटुंबांना आपत्कालीन मदत पुरवली जात आहे.





