Crude Oil: गेल्या सात वर्षांत प्रथमच इराणकडून भारताला मिळणारे कच्चे तेल हुकले जाण्याची चिन्हे आहेत. इराणचे ६ लाख बॅरल तेल घेऊन गुजरातच्या वाडिनार बंदराकडे येणारे ‘पिंग शुन’ (Ping Shun) हे जहाज अचानक आपला मार्ग बदलून आता चीनच्या दिशेने रवाना झाले आहे. नक्की काय घडले? ‘केप्लर’ (Kpler) या जहाज-ट्रॅकिंग डेटा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एस्वातिनीचा ध्वज असलेले हे जहाज गेल्या तीन दिवसांपासून भारताच्या वाडिनार बंदराकडे येत असल्याचे सिग्नल देत होते. मात्र, बंदराजवळ पोहोचण्यापूर्वीच जहाजाने आपली दिशा बदलली आणि चीनमधील ‘दोंगयिंग’ बंदराचा सिग्नल देण्यास सुरुवात केली. मार्ग बदलण्याचे मुख्य कारण: पेमेंटचा पेच शिपिंग तज्ज्ञांच्या मते, हा बदल तांत्रिक नसून आर्थिक कारणांमुळे झाला असण्याची शक्यता आहे. यापूर्वी इराणचे तेल खरेदी करताना ३० ते ६० दिवसांची सवलत (Credit Window) मिळत असे. आता विक्रेत्यांनी आपल्या अटी कडक केल्या असून, ते तातडीने किंवा आगाऊ पैशांची मागणी करत आहेत. यामुळे व्यवहारात अडथळा निर्माण झाला असावा. हेही वाचा – Jan Vishwas Amendment Bill: जन विश्वास विधेयक 2026 मंजूर! छोट्या चुका आता गुन्हा नाहीत २०१९ मध्ये अमेरिकेने कडक निर्बंध लादल्यानंतर भारताने इराणकडून तेल खरेदी करणे बंद केले होते. हे जहाज भारतात आले असते, तर ती ७ वर्षांतील पहिली आयात ठरली असती. वदिनार येथे ‘नयारा एनर्जी’ची मोठी रिफायनरी आहे. हे तेल तिथेच उतरवले जाणार असल्याची चर्चा होती. इस्रायल-इराण युद्धामुळे तेलाच्या किमती वाढू नयेत म्हणून अमेरिकेने नुकतीच ३० दिवसांची विशेष सवलत दिली होती, जी १९ एप्रिलला संपणार आहे. पुढे काय होऊ शकते? तज्ज्ञांच्या मते, जहाजाचा मार्ग बदलणे ही सामान्य प्रक्रिया आहे. जर भारत आणि विक्रेता यांच्यातील पेमेंटचा विषय सुटला, तर हे जहाज पुन्हा भारताकडे वळवले जाऊ शकते. दरम्यान, २०१८ पर्यंत भारत इराणच्या तेलाचा मोठा ग्राहक होता. भारताच्या एकूण गरजेपैकी ११.५% तेल इराणकडून येत असे. मात्र, निर्बंधांनंतर भारताला इराक, सौदी अरेबिया आणि अमेरिकेसारख्या देशांवर अवलंबून राहावे लागले आहे. भारत सरकारने नेहमीच स्पष्ट केले आहे की, इराणकडून तेल खरेदी करण्याचा निर्णय हा व्यापारी फायद्यावर आधारित असेल.