O Panneerselvam Join DMK: तामिळनाडूच्या राजकारणात एक मोठी उलथापालथ झाली आहे. अण्णाद्रमुकचे (AIADMK) माजी नेते आणि तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले ओ. पनीरसेल्वम (ओपीएस) यांनी शुक्रवारी चेन्नईत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या उपस्थितीत द्रमुक (DMK) पक्षात प्रवेश केला. सूत्रांनी सांगितले की, निवडणुकीनंतर द्रमुक पुन्हा सत्तेत आल्यास पनीरसेल्वम यांना विधानसभा अध्यक्षपद दिले जाणार आहे, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. कोण आहेत पनीरसेल्वम? पनीरसेल्वम हे जयललिता यांचे सर्वात विश्वासू आणि आज्ञाधारक सहकारी म्हणून ओळखले जात होते. १९९६ मध्ये पेरियाकुलम नगरपालिकेचे अध्यक्ष होणे हे त्यांचे पहिले स्वप्न होते. त्यानंतर आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री ही सारी पदे त्यांनी ‘अम्मा’ची देणगी मानली. ते इतके विनम्र होते की २००१ मध्ये मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना त्यांनी जयललिता यांच्या पायाला स्पर्श केले होते. ते तीन वेळा मुख्यमंत्री झाले, पण प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या जागी. २००१ मध्ये न्यायालयाच्या आदेशामुळे जयललिता यांना पद सोडावे लागले तेव्हा पहिल्यांदाच आमदार असलेले पनीरसेल्वम मुख्यमंत्री झाले. २०१४ मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जयललिता यांना शिक्षा झाल्यावर ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. २०१६ मध्ये जयललिता रुग्णालयात असताना त्यांना मुख्यमंत्र्यांचे सारे अधिकार दिले गेले, मात्र पदाचे नाव नाही. सरकारी अधिकारी त्यांना लाजाळू, नम्र आणि कारभारात फारसा हस्तक्षेप न करणारे नेते म्हणत असत. टीकाकारांसाठी ते ‘बाहुले’ होते, तर समर्थकांसाठी जयललिता यांचे सर्वात विश्वासू सहकारी. ops join dmk बंडखोरी आणि राजकीय घसरण – २०१६ मध्ये जयललिता यांच्या निधनानंतर पनीरसेल्वम यांनी व्ही. के. शशिकला यांना सत्ता दिली. पण शशिकला शपथ घेणार तेवढ्यात पनीरसेल्वम यांनी मध्यरात्री जयललिता यांच्या समाधीस्थळावर ठाण मांडले आणि उघड बंड केले. या बंडखोरीनंतर मात्र त्यांचे राजकीय वजन वाढण्याऐवजी कमीच होत गेले. एडप्पडी पलानीस्वामी यांनी अण्णाद्रमुकवर एकहाती पकड मिळवली आणि पनीरसेल्वम यांना हळूहळू बाजूला केले. त्यानंतर भाजपने त्यांना अण्णाद्रमुकमध्ये पुन्हा घेण्याची वेळोवेळी आश्वासने दिली, पण ती कधीच पूर्ण झाली नाहीत. २०२४ मध्ये भाजपच्या छुप्या पाठिंब्यावर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, पण पराभव पदरी पडला. अगदी द्रमुकमध्ये प्रवेश करण्याच्या दोन दिवस आधीपर्यंतही एका आरएसएसशी संबंधित नेत्याने त्यांना अण्णाद्रमुकशी जुळवून घेण्याची ग्वाही दिली होती, पण तेही फिसकटले. पनीरसेल्वम यांना स्टॅलिन यांनी का घेतले ? निवडणूक तोंडावर असताना पनीरसेल्वम यांच्यासमोर दोनच पर्याय होते. अभिनेता विजय यांचा नवा आणि अपरिपक्व पक्ष किंवा स्टॅलिन यांचा अनुभवी द्रमुक. स्टॅलिन यांनी विधानसभा अध्यक्षपदाची ऑफर दिली आहे. माजी मुख्यमंत्र्यांसाठी हे पद प्रतिष्ठेचे आहे. थेट प्रशासनाच्या स्पर्धेत न उतरता घटनात्मक दर्जा मिळतो. पनीरसेल्वम यांच्यासोबत माजी खासदार ओ. पी. रवींद्रनाथ कुमार हे त्यांचे पुत्र, वाईथिलिंगम आणि मनोज पंडियन हे निष्ठावंत सहकारीही द्रमुकमध्ये आले. “आधी कर्मचारी आले, आता सीईओच आला,” असे एका वरिष्ठ द्रमुक नेत्याने नेमक्या शब्दांत सांगितले. ops and jayalalitha हेही वाचा: राजकारणात भूकंप, शेअर बाजारात हाहाकार आणि ‘नॅशनल क्रश’चं शाही रिसेप्शन; वाचा आजच्या टाॅप बातम्या द्रमुकला याचा फायदा काय? पनीरसेल्वम हे ‘मुकुलाथोर’ म्हणजेच थेवर समाजाचे नेते आहेत. हा शक्तिशाली ओबीसी समाज दक्षिण तामिळनाडूत मोठ्या प्रमाणात आहे, जिथे द्रमुकला नेहमीच पाय रोवणे कठीण जात आले आहे. पनीरसेल्वम यांचा बोडीनायकनूर मतदारसंघ, वाईथिलिंगम यांचा ओराथनाडू, मनोज पंडियन यांचा अलमकुलम आणि इयप्पन यांचा उसिलम्पट्टी, अशा मतदारसंघनिहाय आघाडी द्रमुकला घट्ट करणारी आहे. याशिवाय काँग्रेसकडून वाढत्या जागांच्या मागणीलाही यामुळे आळा बसणार आहे. घर्षणाची शक्यता – मात्र हे सारे सोपे नाही. बोडीनायकनूर आणि आसपासच्या भागात द्रमुकचे स्थानिक कार्यकर्ते अनेक वर्षे पनीरसेल्वम यांच्याविरोधात लढत आले आहेत. त्याच कार्यकर्त्यांना आता पनीरसेल्वम यांना सामावून घ्यावे लागणार आहे. टी. टी. व्ही. दिनाकरन यांच्या गटातून द्रमुकमध्ये आलेल्या थंगा तमिळचेल्वन यांच्यासारख्या नेत्यांना याचा फटका बसू शकतो. द्रमुक नेतृत्वाने जिल्हा पातळीवर एकच संदेश दिला आहे. निवडणूक जिंकणे हेच सर्वात महत्त्वाचे, बाकी सारे नंतर बघू. दक्षिण तामिळनाडूतील मतदार पनीरसेल्वम यांच्या या निर्णयाला व्यावहारिकता म्हणतात की विश्वासघात, हे निवडणुकीत स्पष्ट होईलच. पण पनीरसेल्वम यांच्यासाठी एक गोष्ट नक्की की जयललिता यांच्या सावलीत जगणाऱ्या या नेत्याने आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या बळावर एक पाऊल उचलले आहे. ते यशस्वी ठरेल का, हे येणारा काळच सांगेल. एप्रिल-मे २०२६ मध्ये निवडणूक अपेक्षित – तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ १० मे २०२६ रोजी संपत असल्याने एप्रिल-मे २०२६ मध्ये निवडणूक अपेक्षित आहे. निवडणूक आयोग मार्च महिन्यात अधिकृत तारखा जाहीर करेल अशी शक्यता आहे. राज्यात एकूण २३४ विधानसभा मतदारसंघ असून बहुमतासाठी ११८ जागा आवश्यक आहेत. सध्या मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुकचे सरकार आहे. २०२१ च्या निवडणुकीत द्रमुकप्रणीत ‘सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स’ने १५९ जागा जिंकल्या होत्या. युत्यांचे चित्र – द्रमुकप्रणीत ‘इंडिया आघाडी’मध्ये काँग्रेस, सीपीएम, एमडीएमके, एमएमके, आययूएमएल, डीएमडीके आणि व्हीसीके हे पक्ष आहेत. विरोधी ‘एनडीए’ आघाडीत अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाखाली भाजप, पीएमके, एएमएमके आणि इतर छोटे पक्ष आहेत. भाजप आणि अण्णाद्रमुक यांनी एप्रिल २०२५ मध्ये पुन्हा युती केली असून पलानीस्वामी हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. काँग्रेस द्रमुकसोबत असली तरी जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मतभेद आहेत. अभिनेता विजय यांच्या ‘तामिळगा वेत्री कळगम’मुळे ही निवडणूक तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.