Tamilnadu Politics : तमिळनाडूतील विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यासाठी जागावाटप निश्चित करण्याच्या दृष्टीने त्या राज्यातील सत्ताधारी आघाडीच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या द्रमुकने मित्रपक्षांशी वाटाघाटी करण्यासाठी ७ सदस्यीय जागावाटप समिती स्थापन केली आहे. द्रमुकच्या समितीचे नेतृत्व ज्येष्ठ नेते टी.आर.बालू करतील. त्या पक्षाने जागावाटप निश्चित करण्यासाठी पाऊले उचलल्याने सत्ताधारी आघाडी निवडणूक मोडमध्ये आल्याचे स्पष्ट होत आहे. त्या आघाडीत द्रमुकनंतर कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष मानला जातो. यावेळी अधिक जागा लढवण्याची आग्रही मागणी कॉंग्रेसकडून केली जात आहे. द्रमुक ती मागणी मान्य करेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आघाडीतील इतर घटक पक्षांमध्ये एमडीएमके, व्हीसीके, माकप आणि भाकपचाही समावेश आहे. एमडीएमके पक्षानेही द्रमुकशी जागावाटपाची चर्चा करण्यासाठी ४ सदस्यीय समिती स्थापन केली. त्यामुळे पुढील काही दिवसांत सत्ताधारी आघाडीचे अंतिम जागावाटप निश्चित होण्याची चिन्हे आहेत. तमिळनाडूत विधानसभेच्या एकूण २३४ जागा आहेत. त्या राज्यात एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यासाठीची घोषणा मार्चच्या मध्यात होऊ शकते.