मराठा आंदोलकांवर हल्ल्याची जबाबदारी घेत गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – पृथ्वीराज चव्हाण

कराड – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त करीत गृहमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
आ. चव्हाण म्हणाले, “मराठा आरक्षणाबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण, आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याचे कळते. या निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे.”
मराठा आरक्षण देण्याबाबत भाजपने कायमच पोकळ घोषणा आतापर्यंत केल्या आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार असताना मराठा समाजाला भाजप सरकार आरक्षण का देऊ शकत नाही? हे सरकारने स्पष्ट करावे. इतकी वर्षे प्रलंबित असणारा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा बांधवांकडून आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु असताना अशा वेळी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांचे आंदोलनच दडपण्याचा क्रूर प्रकार सरकारकडून केला जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठा बांधवांच्यावर आज झालेला लाठीचार्जची घटना निंदनीय असून या घटनेची गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी आम्ही करत आहोत, असे त्यांनी सांगितले





