T20 World Cup 2024 | Mumbai : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकून मायदेशात दाखल झाली आहे. विजेत्या संघाचं राजधानीत दिल्लीत जोरदार स्वागत करण्यात आलं. यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन चर्चा केली. आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती टीम इंडियाच्या विजयी रॅलीची. टीम इंडिया मुंबईत दाखल होणार असून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. 2007 टी20 वर्ल्ड कपमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्यांदा विजयी झाली होती. त्यावेळी देखील टीमची ओपन बसमधून मिरवणूक काढण्यात आली होती. 17 वर्षांनंतर या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होणार आहेत. मुंबईत विमानतळावर दाखल झाल्यानंतर टी इंडियाची नरिमन पॉईंट ते वानखेडे मैदानापर्यंत ओपन बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. टीम इंडियाच्या मिरवणुकीच्या ताफ्यात गुजरातच्या बसेस असणार आहेत. विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. असंख्य क्रिकेटप्रेमी मुंबईतील रस्त्यावर उतरल्यानं सर्वच वाहतूक ठप्प झाली आहे. टीम इंडियासाठी दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकणारा रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू असल्याचे मुंबईकरांचं त्याच्यावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे रोहित शर्मासाठी वानखेडे स्टेडियम आणि परिसरात क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे. दरम्यान या टीम इंडिया खेळाडूंची व्हिक्ट्री परेडच्या वेळी मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर वाहतुकीतदेखील बदल करण्यात आला आहे.