Sushma Andhare : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातचा सीडीआर हा एसआयटी काढत नाही, तर कुणीतरी बाहेरचा व्यक्ती काढते, ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे सीडीआर बाहेर काढलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर कारवाई करावी, मात्र, त्यामध्ये नाव असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एसआयटी चौकशीला कधी बोलवणार?, असा प्रश्न ठाकरेसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. (Sushma Andhare) तसेच, दीपक केसरकर हे या प्रकरणातील सर्व कड्या जोडणारे व्यक्ती आहेत, त्यांनाही चौकशीला कधी बोलावले जाणार याचीही माहिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. सुषमा अंधारे म्हणाल्या, ज्यांनी सीडीआर बाहेर काढले त्यांच्यावर कारवाई करावी, पण ज्यांचे सीडीआरमध्ये नाव निघाले त्यांच्यावर काय कारवाई करणार? या प्रकरणात एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. सातारा ड्रग्जच्या प्रकरणात आम्ही अनेक आरोप केले, पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा यांनी इतक्या वेळा अशोक खरातला कॉल का केला? याची माहिती समोर आली पाहिजे. एसआयटी चांगले काम करेल अशी अपेक्षा आहे, पण नाईलाजाने त्यांच्या तपासाच्या गतीवर टीका करावी लागत आहे. (Sushma Andhare) एखादी माहिती अंजली दमानिया आणि माझ्यापर्यंत पोहोचते, पण तीच माहिती एसआयटीपर्यंत का पोहोचत नाही? या काळात पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर ही नावे मोठी आहेत, त्यामुळे त्यांची चौकशी का केली जात नाही? असा प्रश्नही अंधारे यांनी विचारला. अशोक खरातचा निकटवर्तीय नामकर्ण आवारे, खरातचा सीए ललित पोकळे, नाशिकच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यामध्ये हात असून, त्याची माहिती आम्ही एसआयटीला दिली आहे. परंतु त्यावर अद्याप काहीही कारवाई केली जात नाही, असे अनेक प्रश्न सुषमा अंधारे यांनी केले आहेत.