पुणे – एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत शिवसेनेमध्ये उभी आडवी फूट पाडली आहे. सेनेचे अनेक मात्तबर नेते ठाकरे ब्रँड सोडून शिंदेंसोबत गेले आहेत. काही महिन्यांपूर्वीपर्यंत एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरणारी ही मंडळी आता ठाकरे समर्थक व शिंदे समर्थक अशी दुभंगली असून दोन्ही बाजूचे नेते एकमेकांविरोधात जहरी टीका करताना दिसतायेत. अशातच शिंदे गटात सामील झालेल्या रामदास कदम यांनी केलेली एक आक्षेपार्ह्य टीका आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. ‘सारखं सारखं बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र असल्याचं काय सांगताय? काही संशय आहे का?’ अशी टीका कदमांनी केली होती. यावरून आता उद्धव ठाकरे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ( sushma andhare on ramdas kadam )
रामदास कदमांच्या या जहरी टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आज शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी रामदास कदमांना मातोश्रीने त्यांच्यावर केलेल्या मेहरबान्यांचा पाढाच वाचून दाखवला. महिनाभरापूर्वीपर्यंत आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबियांवर बोलणार नाही, मातोश्रीवर बोलणार नाही म्हणणाऱ्या कदमांनी सरड्यासारखा रंग का बदलला? यामागे दिल्लीश्वरांचे निर्देश आहेत का? असे सवाल अंधारे यांनी उपस्थित केले.
आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल..! – गुलाबराव पाटील
बाळासाहेब म्हणत असतील माझा मुलगा शरद पवार, सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला
“बाळासाहेब ठाकरे वरुन पाहत असतील आणि म्हणत असतील माझा मुलगा शरद पवार, सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला आहे. माझे विचार घेऊन पुढे चाल, माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत असं ते सांगत असतील. पण आमचे उद्धव ठाकरे राष्ट्रवादीची भांडी घासतायत? आणि त्यांचा मुलगा खोके खोके म्हणत टुणटुण उड्या मारत आहे,” असा टोला रामदास कदम यांनी लगावला.
मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं किती वेळा सांगणार? काही संशय आहे का?
“मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं किती वेळा सांगणार? काही संशय आहे का? आम्ही कधी नाही म्हटलं आहे का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं कधी कोणी म्हणाल्याचं ऐकलंय का? तुम्हाला बाळासाहेबांचं नाव का सांगावं लागतं? तुमचं काही कर्तृत्व आहे का?,” अशी विचारणा रामदास कदम यांनी केली.
रश्मी ठाकरेंवरही निशाणा
“आमच्या रश्मी वहिनी मंत्रिमंडळात कशा नाही आल्या याचं आश्चर्य वाटतं. कुठेही गेल्या तरी त्या सोबत हव्यातच. माँसाहेब कधी कोणत्या कार्यक्रमात गेल्या नाहीत, व्यासपीठावर चढल्या नाहीत,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.
सुषमा अंधारेंचा हल्लाबोल ( sushma andhare on ramdas kadam )
“रश्मी ठाकरे यांची कधी राजकारणात लुडबुड नसते परंतु सामनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारताना त्यांना दूषणे देणे योग्य नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार कदम स्वतःला म्हणत असून मीनाताई ठाकरे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले ही बाब पातळी सोडून राजकारण केले जात असल्याचे दाखवून देणारी आहे.”
“रामदास कदम विरोधात पक्षाकडून उद्यापासून आंदोलन केले जाणार आहे. शिवसेना सुसभ्य आणि सुसंस्कृत असून भित्री नाही कारण आम्ही जशास तसे उत्तर देतो. 32 वर्षाच्या पोराने तुमची झोप उडवली आहे त्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहे. पडझडीच्या काळात ही पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत चांगल्या प्रकारे कामगिरी केली आहे. दसरा मेळावा होणार असून पक्ष प्रमुख जो आदेश देतील तो आमच्यासाठी शिरसवंध आहे.” अशी टीका अंधारे यांनी केली.