Nautapa 2026 : पुढचे 9 दिवस सावधान… अखेर ‘नवतपा’ सुरू.! ‘या’ चूका अजिबातच करू नका, अन्यथा तुमच्या जीवावर बेतणार
‘नवतपा’ कालावधी आज, दि. २५ मेपासून सुरू झाला असून तो दि. २ जूनपर्यंत राहणार आहे. या नऊ दिवसांत सूर्याची तीव्रता प्रचंड वाढत असते.

Nautapa 2026 : ज्येष्ठ महिन्यातील सर्वाधिक उष्ण मानला जाणारा ‘नवतपा’ कालावधी आज, दि. २५ मेपासून सुरू झाला असून तो दि. २ जूनपर्यंत राहणार आहे. या नऊ दिवसांत सूर्याची तीव्रता प्रचंड वाढत असल्याने देशातील अनेक भागांमध्ये उकाड्याचा कहर अनुभवायला मिळतो.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाही अनेक ठिकाणी तापमान ४० ते ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे ठरत आहे.
नवतपा म्हणजे नेमकं काय? (Nautapa 2026)
ज्येष्ठ महिन्यात सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, त्या काळातील सलग नऊ दिवसांना ‘नवतपा’ असे म्हटले जाते. पारंपरिक हवामानशास्त्रानुसार हा काळ वर्षातील सर्वाधिक उष्ण मानला जातो.
या दिवसांत जमिनीचे तापमान झपाट्याने वाढते, उष्ण वारे वाहतात आणि शरीरातील पाण्याची कमतरता वेगाने निर्माण होऊ शकते. त्यामुळे उष्माघात, डिहायड्रेशन, अशक्तपणा आणि त्वचेच्या समस्या वाढण्याचा धोका असतो. (Nautapa 2026)

Nautapa 2026 : पुढचे 9 दिवस सावधान… अखेर ‘नवतपा’ सुरू.! ‘या’ चूका अजिबातच करू नका, अन्यथा तुमच्या जीवावर बेतणार
‘ही’ सवय ठरू शकते धोकादायक !
अनेक लोक तहान लागल्यानंतरच पाणी पितात. मात्र नवतपाच्या काळात ही सवय आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते. उष्णतेमुळे शरीरातून सतत घाम बाहेर पडत असल्याने पाण्यासोबत आवश्यक क्षार आणि खनिजेही कमी होतात.
त्यामुळे चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. तज्ज्ञांच्या मते, दर अर्ध्या तासाने थोडे थोडे पाणी पिणे आवश्यक आहे. यासोबतच ताक, लिंबू सरबत, नारळपाणी, बेलाचे सरबत आणि मँगो पन्ना यांसारख्या नैसर्गिक पेयांचा आहारात समावेश करावा.
उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे टाळा :
कडक उन्हातून घरी आल्यानंतर लगेच फ्रिजमधील गार पाणी, कोल्ड ड्रिंक किंवा आईस्क्रीम खाणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. अचानक थंड पदार्थ घेतल्याने शरीराला ‘थर्मल शॉक’ बसू शकतो.
त्यामुळे सर्दी, घसादुखी, ताप आणि पचनाचे विकार होण्याची शक्यता वाढते. बाहेरून आल्यानंतर काही वेळ सावलीत किंवा पंख्याखाली बसून शरीराचे तापमान सामान्य झाल्यावर साधे किंवा माठातील पाणी पिणे अधिक सुरक्षित मानले जाते.
रिकाम्या पोटी उन्हात जाणे टाळा :
सकाळी काहीही न खाता उन्हात बाहेर पडल्यास उष्णतेचा परिणाम अधिक वेगाने होतो. शरीरातील ऊर्जा कमी झाल्याने उष्माघाताचा धोका वाढतो. त्यामुळे बाहेर पडण्यापूर्वी हलका व पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे.
तसेच बाहेरून आल्यानंतर लगेच मसालेदार, तेलकट किंवा अतिजड पदार्थ खाणे टाळावे. उष्णतेमुळे पचनक्रिया मंदावल्याने अशा पदार्थांचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
घामाने भिजल्यानंतर लगेच एसी किंवा थंड अंघोळ टाळा :
उन्हातून आल्यानंतर लगेच एसीमध्ये बसणे किंवा थंड पाण्याने अंघोळ करणेही आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे शरीराचे तापमान अचानक कमी होते आणि रक्तवाहिन्यांवर ताण निर्माण होतो. परिणामी डोकेदुखी, अंगदुखी किंवा अचानक तब्येत बिघडण्याचा धोका वाढतो.
या काळात कोणते कपडे वापरावेत?
नवतपाच्या काळात सिंथेटिक, नायलॉन किंवा गडद रंगाचे घट्ट कपडे टाळावेत. असे कपडे उष्णता अधिक वाढवतात आणि घाम पटकन सुकत नाही. त्यामुळे त्वचेवर पुरळ किंवा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. हलके, सैल आणि सुती कपडे वापरणे अधिक फायदेशीर ठरते.
या गोष्टींची विशेष काळजी घ्या !
– दुपारी १२ ते ४ दरम्यान शक्यतो बाहेर जाणे टाळा
– बाहेर पडताना टोपी, छत्री किंवा सुती टॉवेल वापरा
– लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या
– शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका
– जास्त वेळ उन्हात काम करत असल्यास मधूनमधून विश्रांती घ्या, आराम करा
पावसाबाबत अंदाज काय?
हवामान विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार पुढील काही दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये प्री-मॉन्सून पावसाची शक्यता आहे. कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
मात्र नवतपाचा प्रभाव कायम राहणार असल्याने उकाड्यात फारसा दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.






