Suryakumar Yadav Captaincy : टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून तडकाफडकी हटवलं; संघातूनही पत्ता कट?
Suryakumar Yadav Captaincy : भारताला तिसरा टी-२० विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याबाबत बीसीसीआयने एक मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे.

Suryakumar Yadav Removed From T20I Captaincy Team India : भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारी मोठी बातमी समोर आली आहे. भारताला तिसरा टी-२० विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याबाबत बीसीसीआयने एक मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. विश्वचषक जिंकून अवघे तीन महिने उलटत नाहीत तोच, आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांपूर्वी सूर्यकुमारला थेट कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, आगामी काळात टी-२० संघात त्याचे स्थानही अनिश्चित मानले जात असून त्याला संघातून डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे.
गौतम गंभीर यांच्याशी चर्चेनंतर बीसीसीआयचा मोठा निर्णय!
‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, “निवड समिती, बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी सविस्तर चर्चा करून आता टी-२० मध्ये नव्या कर्णधारासोबत पुढे जाण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक जिंकला हे खरे आहे, पण त्याची सध्याची वैयक्तिक कामगिरी आणि भविष्यातील नियोजन (मिशन २०२८) लक्षात घेता आता बदलाची वेळ आली आहे, असे सर्वांचे मत झाले आहे. आगामी दौऱ्यांसाठी सूर्याच्या निवडीचा विचार केला जाणार नाही आणि हा निर्णय लवकरच त्याला कळवला जाईल.”
आयपीएल २०२६ मधील खराब फॉर्म ठरला कारणीभूत!
🚨 BREAKING – SURYAKUMAR YADAV REMOVED AS INDIA T20 CAPTAIN 🚨
– Surya also set to lose his place in India T20 team as well. (Devendra Pandey). pic.twitter.com/5cLsdc14iY
— Tanuj (@ImTanujSingh) June 3, 2026
सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवण्यामागे त्याचे फलंदाजीतील खराब फॉर्म हे सर्वात मोठे कारण मानले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो सातत्याने धावा कूटण्यासाठी झगडत आहे. नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२६ च्या हंगामातही त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध अर्धशतक झळकावून त्याने मोसमाची सांगता केली असली, तरी संपूर्ण स्पर्धेत १३ डावांत त्याला केवळ २७० धावाच करता आल्या. यादरम्यान त्याची सरासरी फक्त २०.७६ इतकी राहिली, जी त्याच्या दर्जाच्या फलंदाजासाठी अतिशय सुमार मानली जात आहे.
मार्च महिन्यात सूर्याच्या नेतृत्वाखाली भारताने तिसरे टी-२० विश्वचषक विजेतेपद पटकावले, मात्र संपूर्ण स्पर्धेत त्याच्या वैयक्तिक फलंदाजीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. २०२४ मध्ये रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय टी-२० संघाची धुरा ‘मिस्टर ३६०’ सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली होती. मात्र, नेतृत्वाच्या दबावाखाली त्याची स्वतःची फलंदाजी सपशेल फ्लॉप ठरल्यामुळे बीसीसीआयने हा अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे. आता भारताचा नवा टी-२० कर्णधार कोण असणार, याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.





