Supriya Sule : पुणे आता गुन्हेगारांची राजधानी! पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा; सुप्रिया सुळेंची मागणी
Supriya Sule : पुणे गुन्हेगारीत देशात पाचव्या क्रमांकावर; विषारी दारूकांड, कोयता हल्ला आणि महिलांवरील अत्याचारांवरून खासदार सुप्रिया सुळेंचा पत्रकार परिषदेत संताप.

Supriya Sule – पुणे हे शिक्षणाचे माहेर घर म्हणुन ओळखले जायचे. केंद्राच्या अहवालानुसार गुन्हेगारीमध्ये राज्यात पुणे पहिल्या क्रमांकावर आणि देशात पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे आता राज्याची गुन्हेगारांची राजधानीच बनली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरलेल्या पुणे पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्याकडे केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुण्यात विषारी दारुमुळे अनेक नागरिकांचा बळी गेला, ही दुर्देवी घटना आहे. शहरात दिवसाढवळ्या कोयता हल्ला, खुन, गँगवार वाढत चालले आहे. महिला, पालक असुरक्षित आहेत.
महिला आणि चिमुरड्यांवर होणारे अत्याचार मन सुन्न करणारे आहेत. पुण्याचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. गुन्हेगारी रोखण्यात गृहखाते १०० टक्के अपयशी ठरलेले आहे. गुन्हेगारी वाढत असताना पोलीस यंत्रणा मात्र सुस्त आहे. त्यामुळे पुण्याचा कारभार पाहत असलेल्या पुणे पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवरच पाठविण्याची वेळ आली आहे.
जनतेला केवळ पोकळ उत्तरे नको, तर गुन्हेगारांवर कठोर कारवाई हवी आहे, असे सांगत पुण्यातील गुन्हेगारी रोखली नाही तर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढत चालला असून त्या विरुध्दही विरोधी पक्षांकडून आवाज उठविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुण्यातील विधान परिषदेची निवडणुक लढविणार आहेत. पक्षाकडे दोघांनी इच्छुकता दर्शविली आहे. मात्र अद्याप कोणाला उमेदवारी द्यायची याचा अंतिम निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्राजक्त तनपुरेंना शुभेच्छा
प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांनी त्यांच्या काही अडचणी सांगितल्या. त्यावर त्यांना शुभेच्छा दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप नेते म्हणतात की काँग्रेसमुक्त भारत करायचा. मात्र अहिल्यानगरच्या राजकारणाकडे पाहिले तर एक राम शिंदे सोडले तर सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेच भाजपमधे गेल्याचे सांगत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.






