Sunetra Pawar: भीमाशंकर चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे साकडे; ‘या’ मोठ्या संकटापासून महाराष्ट्राला वाचवण्याची केली प्रार्थना
Sunetra Pawar: २०२७ मधील नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर परिसरातील विकासकामांची गती वाढवणार; उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी.

Sunetra Pawar – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवार, दि.१४ रोजी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेत अल नीनोचे संकट दूर होवो, राज्यावर पावसाची कृपादृष्टी राहो,राज्याच्या सुख-समृद्धीसाठी त्यांनी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी भीमाशंकर परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. विकास कामांची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाले, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व मोठे असून येथे देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
भाविकांना अधिक चांगल्या आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सन २०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असून त्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथेही भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे सुरू असलेली विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि निसर्गाच्या कल्याणासाठी भावनिक प्रार्थना केली. यंदा अल नीनोचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे संकट दूर होवो, राज्यात भरपूर आणि समाधानकारक पाऊस पडो, शेतकऱ्यांच्या शेतात हिरवाई नांदो आणि सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी येवो,” अशी मनोभावे प्रार्थना भगवान भीमाशंकर चरणी केल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.




