Devendra Fadnavis: भीमाशंकरचा चेहरामोहरा बदलणार! मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने ‘हेरिटेज वाडी’ प्रकल्पाला मिळाला वेग
Devendra Fadnavis: श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील 'हेरिटेज वाडी' प्रकल्पाच्या कामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी; धार्मिक पर्यटनासह पर्यावरण संवर्धनावर भर.

Devendra Fadnavis – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘हेरिटेज वाडी’ प्रकल्पाला आता वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी प्रकल्पस्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. धार्मिक पर्यटन, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिकांच्या आर्थिक उन्नतीचा समतोल साधणारा हा प्रकल्प भविष्यात भीमाशंकरची नवी ओळख निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित पुनर्वसित गावाची जागा, भाविकांसाठी उभारण्यात येणार्या सुविधा तसेच ग्रामविकासाच्या आराखड्याची सविस्तर माहिती घेतली. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार महेश लांडगे, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भीमाशंकरला भेट देणार्या भाविकांना केवळ मंदिर दर्शनच नव्हे,

भाविकांसाठी उभारण्यात येणार्या सुविधा आणि ग्रामविकास आराखड्याची माहिती घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
तर स्थानिक संस्कृती, परंपरा आणि ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव देण्याच्या उद्देशाने ‘हेरिटेज वाडी’ची संकल्पना विकसित करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत सध्या मंदिर परिसरात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे अल्प अंतरावर नियोजनबद्ध पुनर्वसन करण्यात येणार आहे. नव्या वसाहतीमध्ये पारंपरिक वास्तुरचनेसह आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ग्रामपंचायत कार्यालय, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र, अंतर्गत रस्ते, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा तसेच पर्यटकांसाठी आकर्षक व्यवस्था उभारण्यात येणार आहे.
आकर्षक तीर्थक्षेत्र आणि पर्यटन केंद्र
पर्यटनवाढीमुळे स्थानिकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी व्यावसायिक गाळे, सेवा केंद्रे आणि पर्यटनपूरक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांच्या वाढत्या संख्येचा थेट लाभ स्थानिक अर्थव्यवस्थेला होईल. प्रकल्पामुळे मंदिर परिसरातील गर्दीचे व्यवस्थापन, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही मोठी सुधारणा होणार आहे. धार्मिक पर्यटनासोबत पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श निर्माण करत भीमाशंकरला राष्ट्रीय स्तरावरील आकर्षक तीर्थक्षेत्र आणि पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा मानस असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.





