Sugar prices : देशात मोठा साखर ‘घोटाळा’? राजू शेट्टींचे मोदींना पत्र; प्रत्येक जिल्ह्यातील गोडाऊन तपासण्याची मागणी
Sugar prices : साखरेच्या वाढत्या दरावर राजू शेट्टी आक्रमक; साखरेच्या साठ्याचा हिशोब तपासण्यासह प्रत्येक जिल्ह्यातील गोडाऊन तपासण्याची मागणी.

Sugar prices : देशभरात साखरेच्या दरात झालेल्या वाढीवरून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. साखरेची प्रत्यक्षात टंचाई नसताना दरवाढ का झाली, असा सवाल करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. साखरेच्या साठ्याची सखोल चौकशी करून प्रत्येक जिल्ह्यात खासगी व्यापारी आणि साखर कारखानदारांच्या गोडाऊनची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली.
शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, सरकारकडून दर महिन्याला 22 लाख टन साखरेचा कोटा दिला जातो. मात्र, सरकारच्या आकडेवारीनुसार उपलब्ध असलेल्या 45 ते 48 लाख टन साखरेचा हिशोब लागत नाही. रिकव्हरी लपवून किंवा साखर साठवून ठेवून ती चढ्या दराने विकली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काही साखर कारखान्यांनी टेंडर काढूनही साखर विकली नसल्याचा दावा करत दरवाढ आधीच ठरवून करण्यात आली असावी, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
‘गोडाऊनमधील साठा तपासा’
साखरेची खरोखरच टंचाई असती तर देशभर साखर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असती. मात्र, साखर उपलब्ध असून केवळ तिचे दर वाढले आहेत, असे शेट्टी म्हणाले. त्यामुळे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी व्यापारी आणि साखर कारखानदारांच्या गोडाऊनची तपासणी करावी. कागदावरील साठा आणि प्रत्यक्ष गोडाऊनमधील साठा याची पडताळणी करून रेकॉर्डवर नसलेली साखर जप्त करावी, अशी मागणी त्यांनी केली.
बांगलादेश, पाकिस्तानला चोरट्या मार्गाने निर्यात?
केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंदी घातली असतानाही चोरट्या मार्गाने साखर बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये गेली का, याचीही चौकशी करण्याची मागणी शेट्टी यांनी केली. ग्राहकांच्या खिशावर दरोडा पडत असून देशाबाहेर साखर गेली असल्यास त्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि प्रल्हाद जोशी यांची असल्याचा आरोप त्यांनी केला. काही मोजक्या लोकांनी, ज्यांची कार्यालये दुबईत आहेत, हे केल्याचा आरोपही त्यांनी केला.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांची एफआरपी द्यावी, अन्यथा वेळप्रसंगी कायदा हातात घेण्याचा इशाराही शेट्टी यांनी दिला.
दरम्यान, केंद्र सरकारने 10 लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही साखर ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता असून त्याच काळात साखर कारखाने सुरू होतील. त्यामुळे त्यावेळी साखरेचे दर कोसळून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो, अशी नाराजीही शेट्टी यांनी व्यक्त केली. पुढील वर्षी देशात 300 लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असेही त्यांनी सांगितले.
शक्तिपीठ महामार्गालाही विरोध
शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले. या महामार्गासाठी 26 हजार एकर जमीन जाणार असून त्यातील 19 हजार एकर जमीन बागायती असल्याचा दावा त्यांनी केला. देवाचे नाव घेऊन सरकार रस्ता उभारत असून सावता माळी यांच्या गावातून आणि स्मारकावरून रस्ता नेला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय चुकीचा नसल्याचे सांगत सूर्यफुलाच्या तेलाच्या नावाखाली पामतेल मिसळले जात असल्याच्या प्रकाराचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.





