भुईंज : वाई तालुक्यातील पूर्व भागातील किकली,लगडवाडी, बेलमाची, जांब, देगाव, चांदवडी यासह अनेक गावांमध्ये येणाऱ्या एसटी बस च्या फेऱ्या कमी केल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशां पुढे संकट ओढवले असून वाई आगाराच्या मनमानी कारभारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमधून विद्यार्थी शाळा, महाविद्यालयीन शिक्षण, खाजगी क्लासेस यासाठी भुईंज, पाचवड, वाई, सातारा या ठिकाणी जात असतात. मात्र, वाई एसटी आगाराच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामीण भागातील फेऱ्या बंद केल्याने विद्यार्थ्यांना वडापाचा आधार घ्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना आथिर्क संकटाचा सामना करावा लागत आहे. वाई तालुक्याच्या पूर्व भागातून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. भुईंज, पाचवड महामार्गावर सकाळच्या वेळेस एसटीच्या फेऱ्या होत नाहीत. त्यामुळे पास असतानाही जास्त पैसे देऊन विद्यार्थ्यांना इतर वाहनांचा, वडापचा आधार घ्यावा लागत आहे. शालेय महाविद्यालयीन शिक्षणासाठी सवलतीच्या दरात मासिक पास देण्यात आले आहेत. वाई तालुक्यात ही अशीच परिस्थिती असून अनेक गावात एसटी बसेस जात नाहीत. त्यामुळे एसटी बस शिवाय प्रवास करायचा झाल्यास दिवसाकाठी विद्यार्थ्यांना पदरमोड करावी लागत आहे. केवळ विद्यार्थ्यांना त्रास होतो असे नाही तर पालकांनाही याची आर्थिक झळ सोसावी लागत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाण एसटी सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हीच परिस्थिती तालुक्यातील अनेक गावांमध्ये आहे. एसटीला अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे कारण सांगून विद्यार्थ्यांचे होणारे हाल आणि पालकांच्या खिशाला बसणारी झळ याचा विचार तरी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चौकटलोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे सद्यस्थितीत तालुक्याच्या पूर्व भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी सवलतीच्या दरात मासिक प्रवास करतात. मात्र, पूर्व भागातील एसटी फेऱ्या कमी केल्याने विद्यार्थ्यांसह महिला, अबालवृद्धांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी व ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून तातडीने पूर्व भागातील एसटी बस सुरू कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आथिर्क झळीने पालक संतप्त वाई तालुक्याच्या पूर्व भागातील शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्याच्या दुचाकी, चारचाकी वाहनांचा, वडापचा आधार घ्यावा लागत आहे. कित्येक गावातील विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी वेळोवेळी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत वेळप्रसंगी एसटी अडवण्याची भूमिका यापूर्वीही घेतली होती. सध्या स्थितीत अनेक गावांमध्ये एसटी जात नसल्याने विद्यार्थ्यांना मुख्य मार्गासह महामार्गावरच उतरावे लागत आहे. तिथून दुसऱ्या वाहनांना हात करून घरात पर्यंत पोहोचावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. एसटी बस नसल्याने पालकांना आथिर्क झळ सोसावी लागत आहे.