पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला २ कोटी नोकरी देण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात गेल्या नऊ वर्षांत ७ लाख जणांना नोकरी देण्यात आली. तसा अहवाल आंतराष्ट्रीय कामगार संघटनेने दिला आहे. त्यामुळे तरुणांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. तरुणांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करावा लागणार आहे.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक झाल्यावर आपण त्यावर काम करू, असे सांगून पवारांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले.
यावेळी शरद पवार यांच्याशी बोलतांना विद्यार्थांनी अभ्यास आणि नोकर भर्ती या मुद्यांवर आपली व्यस्था सांगितली. विद्यार्थी लाखोंच्या संख्येने आहे. सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहून हे रात्रंदिवस एक करत अभ्यास करत असतात. परंतु महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या धोरणांचा फटका या विद्यार्थ्यांना बसत आहे. कधी परीक्षा होत नाही, परीक्षा झाल्या तर निकाल वेळेवर लागत नाही, निकाल लागला तर नियुक्ती वेळेवर होत नाही, या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. असं म्हणत आता तुम्हीच सांगा, जगायंच कसं…असा प्रश्नच या विद्यार्थ्यांनी शरद पवार यांना विचारला.
बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या “अस्वस्थ तरुणाई, आश्वासक साहेब’ कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी आमदार अशोक पवार, रवींद्र धंगेकर, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी, भूषणसिंह होळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काॅंग्रेसचे मोहन जोशी, अखिल भारतीय शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर उपस्थित होते.
यावेळी काही उमेदवारांनी आपल्या व्यथा मांडल्या. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. यावरुन सध्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना विविध समस्यांना कसे तोंड द्यावे लागत आहे, याचे भीषण चित्र सर्वांसमोर निदर्शनास आले. उमेदवारांच्या सर्व मागण्या रास्त असून, त्यावर लोकसभा निवडणुका संपल्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली.
त्याचबरोबर सर्व स्पर्धा परीक्षा एमपीएससीमार्फत व्हाव्यात, अशी मागणी उमेदवारांनी केली. त्यावर सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत व्हाव्यात. कंत्राटी पद्धतीने पदभरती बंद करावी. कायमस्वरूपी नोकरी द्यावी. प्रलंबित नोकरभरती पूर्ण करावी. महाराष्ट्रात उद्योग, व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न असल्याचे पवार यांनी सांगितले. या वेळी उमेदवारांनी भरती परीक्षा वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी केली. त्यावर राजस्थान सरकार वय वाढवून देण्याचा निर्णय घेऊ शकत असेल, तर महाराष्ट्र सरकार का नाही? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
हे वाचलं का ? ‘सांगलीची जागा काँग्रेसची हे जनावर सुद्धा सांगेल’ विश्वजीत कदम यांनी ठाकरे गटावर साधला निशाणा