Vishwajeet Kadam । महाविकास आघाडीतील सांगली लोकसभेच्या जागेवरील तिढा वाढत असून तो दिल्ली दरबारी पोहोचला आहे. यासाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. दुसरीकडे सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गट लढवत असल्याचे पुन्हा एकदा संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी घोषित केली आहे. येथून काँग्रेसचे विशाल पाटील इच्छूक आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. सांगलीची जागा आमची होती, आहे आणि राहीन. सांगलीची जागा काँग्रेसची आहे, हे जनावरांना सुद्धा माहीत आहे, असा टोलाच काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी लगावला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
नेमकं काय म्हणाले विश्वजीत कदम
‘सांगली जिल्ह्यातील लोकांचे म्हणणं आहे की, सांगलीची जागा परंपरेनं काँग्रेसची आहे. आमचं मजबुत संघटन आहे. ती जागा लढण्यास आम्ही सक्षम आहोत. संजय राऊत काय बोलतात, यावर प्रतिक्रिया देण्याची आवशकता नाही. सांगलीच्या समाजकारण आणि राजकारणाचा इतिहास आणि भूगोल ज्याला माहीत आहे, तो कुठलाही व्यक्ती किंवा सांगलीच्या एखाद्या जनावराला सुद्धा विचारलं ( संजय राऊत यांना टोला) तर तोही सांगेल की, सांगली काँग्रेस विचारधारेचा जिल्हा आहे. कारण शेतकऱ्यांची जनावरं असतात. संजय राऊत कुठल्या अर्थाने बोलले मला माहित नाही, असा हल्ला यांनी चढवला.