Student Safety: चिमुकल्यांचा जीव धोक्यात? मुख्य रस्त्यांवरील शाळांच्या बाहेर वाहतुकीचा बोजवारा; पालक तीव्र चिंतेत
Student Safety: फुटपाथवरील अतिक्रमणे आणि झेब्रा क्रॉसिंगचा अभाव; शाळांच्या वेळेत वाहतूक पोलिसांची विशेष नियुक्ती करण्याची पालकांची आग्रही मागणी.

Student Safety – पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक शाळांच्या प्रवेशद्वाराबाहेर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सकाळी शाळा भरताना आणि दुपारी आणि संध्याकाळी सुटताना वाहनांची प्रचंड गर्दी होते. भरधाव वाहने, अपुरे फुटपाथ, झेब्रा क्रॉसिंगचा अभाव आणि वाहतूक नियोजनातील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
शहरातील अनेक शाळा मुख्य रस्त्यालगत आहेत. पुणे-मुंबई महामार्ग, जुना पुणे-मुंबई रस्ता, पिंपरी-काळेवाडी लिंक रोड, वाकड बीआरटीएस मार्ग, भोसरी-आळंदी रस्ता आणि इतर प्रमुख मार्गांवरील शाळांसमोर दररोज वाहतुकीचा ताण वाढत आहे. शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत या ठिकाणी अक्षरशः गोंधळाचे वातावरण निर्माण होते. शाळांसमोर ऑटो रिक्षा, स्कूल बस, खासगी वाहने आणि दुचाकींच्या रांगा लागतात.
अनेक पालक वाहने रस्त्यावरच उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढते. अनेक विद्यार्थी पालकांची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे राहतात. याच वेळी भरधाव वाहनांची ये-जा सुरू असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो. शहरातील काही शाळांसमोर झेब्रा क्रॉसिंग नाही. अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकरही नाहीत. फुटपाथ अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना थेट रस्त्यावरून चालावे लागते.
वाहतूक पोलिसांचा नियमित बंदोबस्तही अनेक ठिकाणी दिसत नसल्याची पालकांची तक्रार आहे. शाळा परिसरात तातडीने झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक आणि वाहतूक नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था उभारण्याची गरज व्यक्त केली आहे. शाळा सुटण्याच्या वेळेत वाहतूक पोलिसांची विशेष नियुक्ती करावी. तसेच बसथांबे आणि पार्किंगचे योग्य नियोजन केल्यास कोंडी आणि अपघाताचा धोका कमी होईल, असा विश्वास पालकांना वाटत आहे.
कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजनांची गरज
शहरातील विद्यार्थ्यांची सुरक्षा ही केवळ शाळांची नव्हे, तर महापालिका, वाहतूक पोलीस आणि पालकांचीही संयुक्त जबाबदारी आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता शाळा परिसरात तातडीने कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शहरातील काही खासगी शाळांच्या बाहेरही सुरक्षा रक्षक नियुक्त केले आहेत. शाळेत बस प्रवेश करताना आणि शाळेच्या आवारातून बस बाहेर जाताना हे सुरक्षा रक्षक इतर वाहनांना थांबवितात.





