Arvind Kejriwal : दिल्लीच्या रस्त्यांवरील गॅंगवाॅर थांबवा; अरविंद केजरीवाल यांची योगींकडे मागणी

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे आणि म्हटले आहे की ज्याप्रमाणे योगीजींनी उत्तर प्रदेशची सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे, त्याचप्रमाणे त्यांनी अमित शहांना सुरक्षा व्यवस्था कशी सुधारायची याचे मार्गदर्शन करावे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे रस्त्यावर होणारे गॅंगवाॅर कमी करण्यासाठी योगींनी शहांना मार्गदर्शन करावे, असेही केजरीवाल म्हणाले.
दिल्लीत गुंड मुक्तपणे फिरत आहेत. ११ मोठे गुंड गट आहेत ज्यांनी संपूर्ण दिल्लीचे ११ भाग केले आहेत आणि ते उघडपणे व्यावसायिकांकडून खंडणीची मागणी करत आहेत. आम्हाला ३ कोटी रुपये द्या, ४ कोटी रुपये द्या, नाहीतर आम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकू असे फोन व्यावसायिकांकडून येत आहेत. दिल्लीच्या रस्त्यांवर टोळीयुद्धे सुरू आहेत.
महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दिल्लीत दररोज १७ मुलांचे अपहरण होते. दिल्लीत उघडपणे चाकूहल्ला सुरू आहे, लोकांची हत्या होत आहे. चेन स्नॅचिंग होत आहे. चोरीच्या घटना घडत आहेत. दरोडे पडत आहेत. संपूर्ण दिल्ली घाबरली आहे आणि लोक खूप घाबरले आहेत, यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रिय गृहमंत्र्यांना काही सूचना देणे आवश्यक आहे, असे केजरीवाल म्हणाले.
उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारली आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातील सर्व गुंडांचा खात्मा केल्याचेही सांगितले. जर असं असेल तर मी योगीजींना सांगू इच्छितो की दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था थेट अमित शहाजींच्या अधीन येते. अमित शहा जी देशाचे गृहमंत्री आहेत आणि दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था, दिल्लीची सुरक्षा, दिल्लीतील लोकांना सुरक्षित जीवन प्रदान करणे ही थेट अमित शहांची जबाबदारी आहे.





