Uddhav Thackeray – कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचला आहे. त्यात संवेदना नसलेल्या सरकारचा तुघलकी कारभार चालू आहे. अशा अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने थाप मारून वेळ काढायचा प्रयत्न केला आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उबाठा) नेते उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागणीसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठे आंदोलन उभारले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत सरकारने ३० जून २०२६ पर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करू असे सांगितले. बच्चू कडू यांनी सरकारच्या या भूमिकेचे स्वागत केले. परंतु, विरोधकांनी मात्र सरकार वेळकाढूपणा करत आहे. शेतकऱ्यांना झुलवत ठेवले जात आहे, असा त्यांनी आरोप केला. त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी तत्काळ कर्जमाफी करावी, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना फसवण्याचा खेळ बंद करा, असेही ठाकरेंनी सरकारला सुनावले आहे. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था समोर दिसत असताना तुमची परदेशी समिती नेमकी कसला अभ्यास करून अहवाल देणार? पुढच्या वर्षी जूनमध्ये जर खरंच कर्जमाफी होणार असेल तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते भरायचे का? पुढील वर्षी जुनच्या कर्जमाफीत हे हप्ते माफ होणार असतील तर ते का भरायचे? ते न भरता शेतकऱ्यांना रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे का? जर नव्याने कर्ज मिळणार असेल तर ते देखील माफ होणार का? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? असे अनेक सवाल उद्धव ठाकरेंनी केले आहेत. सरकारने हजारो कोटींच्या नुकसानभरपाईची घोषणा केली, पण शेतकऱ्यांच्या खात्यावर किती पैसे जमा झाले हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रात सहा महिन्यांपासून पाऊस पडतो आहे. शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. कर्जमुक्ती देण्याची यापेक्षा आणखी योग्य वेळ कोणती असू शकते? तरीही योग्य वेळ आल्यावर कर्जमुक्ती देऊ असे सांगून सरकारने जो वेळकाढूपणा चालवला आहे, ती शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे,असे ठाकरेंनी म्हटले आहे.