Share Market: भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी अभूतपूर्व उसळी घेत गेल्या आठ महिन्यांतील सर्वात मोठी तेजी नोंदवली. भारत आणि अमेरिका यांच्यातील महत्त्वपूर्ण व्यापार कराराच्या (ट्रेड डील) घोषणेचा सकारात्मक परिणाम दलाल स्ट्रीटवर दिसून आला. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सलग दुसऱ्या दिवशी बाजार मोठ्या वाढीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेंसेक्स’ २,०७३ अंकांच्या वाढीसह ८३,७३९.१३ वर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ६३९ अंकांनी वधारून २५,७२७.५५ च्या पातळीवर बंद झाला. टक्केवारीचा विचार करता दोन्ही निर्देशांकांमध्ये अडीच टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, १२ मे २०२५ नंतरची ही बाजारपेठेतील सर्वात मोठी एका दिवसातील झेप ठरली आहे. गुंतवणूकदारांनी १२.०६ लाख कोटी रुपये कमावले – या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी भर पडली आहे. बीएसईमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आदल्या दिवशी ४५५.०३ लाख कोटी रुपये होते, ते आज व्यवहार संपताना ४६७.०९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. अशा प्रकारे, एकाच दिवसात गुंतवणूकदारांनी तब्बल १२.०६ लाख कोटी रुपये कमावले आहेत. stock market बाजारात केवळ बड्या कंपन्याच नव्हे, तर मध्यम आणि छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही जोरदार खरेदी झाली. बीएसई मिडकॅप निर्देशांक २.७९ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक २.९१ टक्क्यांनी वधारला. बाजारातील सर्व १६ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांनी हिरव्या चिन्हात व्यवहार पूर्ण केला, ज्यात काही क्षेत्रांमध्ये ५ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. हेही वाचा – Rahul Gandhi: लोकसभेत राहुल गांधींनी पुन्हा उचलला चीनचा मुद्दा; केंद्रीय मंत्र्यांचे प्रत्युत्तर, गदारोळानंतर कामकाज स्थगित अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ९.१२ टक्क्यांची वाढ – सेंसेक्समधील ३० पैकी २८ समभागांनी आज नफा कमावला. अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ९.१२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, इंडिगो, पॉवर ग्रिड आणि सन फार्मा यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स ४.६३ ते ६.६८ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. दुसरीकडे, टेक महिंद्रा आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स या दोनच कंपन्यांच्या शेअर्समध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली. टेक महिंद्राचा शेअर ०.५७ टक्क्यांनी घसरला. ४,४२२ कंपन्यांच्या शेअर्समध्ये व्यवहार – बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर आज एकूण ४,४२२ कंपन्यांच्या शेअर्समध्ये व्यवहार झाला. त्यापैकी ३,२९९ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर ९८९ शेअर्समध्ये घसरण झाली. १३४ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. बाजारातील या सकारात्मक वातावरणामुळे १२१ शेअर्सनी त्यांच्या ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर ११७ शेअर्सनी वर्षभरातील नीचांकी पातळी गाठली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदलती व्यापार समीकरणे आणि वाढलेला परकीय ओघ यामुळे बाजार येत्या काळातही सकारात्मक राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.