ST Bus News – सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन चालणाऱ्या लालपरीमध्ये काही बिघाड झाल्याने रस्त्यातच उभी करावी लागत आहे. अगदी सर्वसामान्यपासून ते मध्यम वर्गाच्या खिशाला परवडणाऱ्या लालपरीमुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. घाडगे तळई (पारगाव) या गाव-खेड्यांपासून ते पुणे शहरांकडे जाण्यासाठी एसटी बस सुविधा उपलब्ध आहे. यातीलच एक बस सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव परिसरात इंजिनमध्ये बिघाड झाल्याने रस्त्यातच उभी करावी लागली. इतर सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवासी रस्त्याच्या कडेला ऊभे राहून प्रवासासाठी इतर वाहनांची वाट पाहत उभे होते. कामगार वर्ग,विद्यार्थी,नोकरदार आदी सर्व प्रवाशांच्या चेहऱ्यावर वेळेत पोहचू की नाही, अशी चिंता जाणवत होती. काहीं वेळाने मागून येणाऱ्या पीएमपीएमएल बसमुळे प्रवासासाठी पर्याय उपलब्ध झाल्याने सर्व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. लालपरीच्या चालकांनी सर्व प्रवाशांना वाघोली स्थानकापर्यंत पोहोच करण्याची व्यवस्था केली. परंतु मागील काही महिन्यांपासून अनेक बसची दुरवस्था झाल्याने अनेक गाड्या या महामार्गावर बंद पडल्याचे दिसत आहे. अनेक गाड्यांच्या खिडक्या, आसने तुटलेली आहेत. गळके छप्पर, तर काही ठिकाणी तंबाखू ,गुटखा खाऊन थुंकल्याचे समोर येत आहे. तसेच वेळेत बस न येणे, प्रवासादरम्यान मध्येच बस नादुरुस्त, तसेच टायर पंक्चर होण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. एसटी बस ग्रामीण भागातील दळणवळणात एसटी महामंडळाच्या ‘लाल परी’ची महत्त्वाची भूमिका आहे. पुणे आगारातून गाव-खेड्यांपासून लांब पल्ल्याच्या बससेवा सुरू आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातील प्रवाशांना दिलासा मिळाला; मात्र नादुरुस्त बसमुळे शाश्वत प्रवासाची हमी दुरावली आहे. पंक्चर झालेला टायर काढण्यासाठी अनेक बसमध्ये स्टेपनीसारख्या वस्तू उपलब्ध नसतात. त्यामुळे प्रवाशांना बसमधून उतरवून दुसऱ्या बसमध्ये बसण्याची व्यवस्था वाहकाला करावी लागते. त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो. ग्रामीण भागातून जेष्ठ नागरिक ससून रुग्णालयात उपचारासाठी नियमित जात असतात अशा रुग्ण प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. विद्यार्थी शाळेत, चाकरमानी कार्यालयात अथवा घरी वेळेत पोहोचत नाहीत. मागील अनेक महिन्यांपासून अनेक तालुक्यातील विद्यार्थी, चाकरमानी आणि अन्य प्रवासी त्रास सहन करत आहेत.सरकारने वयोवृद्धांना मोफत, तर महिलांना अर्ध्या भाड्यात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, बस इच्छीतस्थळी सुखरूप पोहोचवेल, याची शाश्वती राहिलेली नाही. “सरकारने महिलांना अर्ध्या भाड्यात प्रवासाची सुविधा दिली, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, त्यांना इच्छीतस्थळी सुखरूप पोहोचवतील, अशी काही बसची स्थिती राहिलेली नाही. जुन्या बसमुळे विद्यार्थी, महिला आणि चाकरमानी हैराण होत आहेत. या आगाराच्या बहुतांश गाड्यांची अवस्था अगदीच जेमतेम आहे. त्याच अवस्थेत प्रवास करावा लागतो.” – विशाल गायकवाड, प्रवासी.