Pachavad News : ना सूचना फलक, ना दिशादर्शक.! पाचवड नजीकचा गतिरोधक ठरतोय जीवघेणा; वाहनचालकांमध्ये संभ्रम
पाचवड मार्गावरील सर्व्हिस रोड परिसरात बसविण्यात आलेला गतिरोधक आणि अपुऱ्या वाहतूक नियोजनामुळे वाहनचालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे.

पाचवड : पाचवड नजीक NH-4 महामार्गालगत असलेल्या उडतारे–पाचवड मार्गावरील सर्व्हिस रोड परिसरात बसविण्यात आलेला गतिरोधक आणि अपुऱ्या वाहतूक नियोजनामुळे वाहनचालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत असून भविष्यात गंभीर अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून डाव्या बाजूने वळून अनेक वाहने सर्व्हिस रोडवर प्रवेश करतात. तसेच पाचवडकडून उडतारेच्या दिशेने सर्व्हिस रोडचा वापर करणारी वाहनेही सतत या मार्गावरून ये-जा करत असतात. मात्र या परिसरात बसविण्यात आलेला गतिरोधक आणि रस्त्यावरील दिशादर्शक व्यवस्थेचा अभाव यामुळे वाहनचालकांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे.
विशेषतः महामार्गावरून येणारी वाहने आणि सर्व्हिस रोडवरून पाचवडकडून उडतारेच्या दिशेने येणारी वाहने अनेकदा समोरासमोर येत असल्याचे प्रकार घडत आहेत. रस्त्यावर कुठेही स्पष्ट दिशादर्शक फलक, “One Way”, “Wrong Way”, “Slow” यासारख्या सूचना किंवा लेन दर्शविणारी चिन्हे नसल्यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांना मार्ग समजण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे चालकांना अचानक समोरून वाहन आल्याचे लक्षात येत असून अपघाताची शक्यता वाढत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सर्व्हिस रोडवरील गतिरोधक वाहनांची गती कमी करण्यासाठी बसविण्यात आला असला तरी त्याची सध्याची स्थिती आणि वाहतुकीचे अपुरे नियोजन यामुळे उलट समस्या निर्माण झाली आहे. या ठिकाणी वाहने कोणत्या दिशेने यावीत आणि कोणत्या दिशेने जाऊ नयेत याबाबत स्पष्ट सूचना नसल्यामुळे अनेक वाहनचालक चुकीच्या दिशेने प्रवेश करत आहेत.
या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहनांची वर्दळ असते. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था अपुरी असल्याने आणि रिफ्लेक्टर नसल्याने धोका आणखी वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वीही या परिसरात किरकोळ अपघात आणि वाहनचालकांमध्ये वादाचे प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासन आणि महामार्ग विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यामध्ये स्पष्ट सूचना फलक बसविणे, दिशादर्शक चिन्हे लावणे, रस्त्यावर लेन मार्किंग करणे, रिफ्लेक्टर आणि कॅट आय बसविणे तसेच वाहतुकीचे तांत्रिक नियोजन करणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे.
वेळेत आवश्यक बदल करण्यात आले नाहीत तर भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.





