काव्यप्रभू, काव्यसागर, सृजनशीलकवी, गीतकार जगदीश खेबुडकर यांचा आज स्मृतिदिन (निधन 3 मे 2011).
गीतकार जगदीश खेबुडकर यांचा जन्म 10 मे 1932 रोजी कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. त्यांचे वडील शिक्षक असल्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे खेबुडकरांचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. कोल्हापूर येथील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिकले, त्याच शाळेत खेबुडकर यांनी माध्यमिक शिक्षक म्हणून 35 वर्षे काम केलं. शालेय जीवनापासूनच कथा-नाट्य-काव्याची आवड असणाऱ्या खेबुडकरांनी विश्वभारतीसारख्या मेळाव्यातून रुपये एक, इतक्या नाममात्र मानधनावर आपली कला समृद्धीकडे नेली. वर्ष 1956 मध्ये “खांद्यावरती शतजन्माच्या घेऊन पुण्याईला, काशीला श्रावण बाळ निघाला’ हे त्यांचे पहिले गीत आकाशवाणीवर प्रसारित झाले. त्यावेळी पुणे आकाशवाणीने त्यांची 50 नवीन गाणी स्वीकारली आणि त्यांच्या गीतप्रवासास गती मिळाली.
आघाडीचे संगीतकार वसंत पवार यांनी यातील गाणी ऐकली आणि त्यांना चित्रपट गीते लिहिण्यासाठी बोलावून घेतले “रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची गीते लिहिण्याची संधी त्यांना दिली. त्यावेळी त्यांनी लिहिलेले “मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’ या गाण्याने अख्ख्या महाराष्ट्राला ठसका लागला आणि पडद्यावर खेबुडकर प्रकाशात आले. वर्ष 1960 मधील प्रतिष्ठेचे रसरंग फाळके पारितोषिक या लावणीला मिळाले. त्यानंतर जगदीश खेबुडकर यांना राज्य शासनाच्या 11 पुरस्कारांसह 60 हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांची चित्रगीतांची सुरुवात जरी लावणीपासून झाली तरी तेवढ्याच ताकदीने त्यांनी भावगीते व भक्तिगीतेही लिहिली.
त्यांच्या गीतलेखन कारकिर्दीत भालजी पेंढारकरपासून यशवंत भालकर असे 35 दिग्दर्शक, वसंत पवार ते शशांक पोवार असे 44 संगीतकार आणि सुधीर फडके ते अजित कडकडे अशा 34 गायकांसमवेत काम केले. कवितेबरोबर 25 पटकथा, संवाद, 50 लघुकथा, 5 नाटके, 4 दूरदर्शन मालिका, 4 टेलिफिल्म, 5 मालिका गीते इतकी साहित्यसंपदा त्यांनी निर्माण केली.
प्रतिभा आपल्यामध्ये असेल तर ती योग्य वेळी बाहेर पडतेच, असे खेबुडकरांचे मत होते. तसेच वाचनामुळे या प्रतिभेला शब्दसामर्थ्य मिळते. त्यांचा स्वतःचा जवळजवळ 10 हजार पुस्तकांचा संग्रह होता. त्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतेक संतांचे ग्रंथ, नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांपर्यंत सगळ्याचा समावेश होता. आपली कलाकृती ही किती कमी वेळात मिळणाऱ्या प्रसिद्धीपेक्षा ती किती दिवस टिकते, याला जास्त महत्त्व आहे, असेही ते म्हणत. गदिमा, बा. सी. मर्ढेकर, भा. रा. तांबे ही त्यांची आदराची स्थाने होती. चित्रपटसृष्टीत कालानुरूप गीत संगीतात आमूलाग्र बदल होत गेले. मराठीत कधी ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक तर कधी विनोदी तर कधी तमाशाप्रधान तर कधी कौटुंबिक चित्रपटांची लाट यायची. “साधी माणसं’, “आम्ही जातो आमच्या गावा’, “कुंकवाचा करंडा’ आदी कौटुंबिक चित्रपटांसाठीची त्यांची गीते अतिशय गाजली.
दिग्दर्शन, निर्मिती, अभिनय, कथानक तसेच अभिनेते यावर चित्रपटांचे महत्त्व वाढत असले, तरी चित्रपट कोणताही असो गीत, संगीत आणि नृत्य यामुळे चित्रपटाला साज चढविला जात असे. गीत लिहिताना कथानक व त्यातील प्रसंगाला धरून रचना करणे हे गीतकाराला आव्हानच असायचे. त्यामुळे चित्रपटसृष्टीत गीतकार हा महत्त्वाचा घटक मानला जाऊ लागला. कधी कधी संगीतकारांनी आधीच चाल तयार करून ठेवलेली असे आणि त्याबरहुकूम गीतकाराला गीत लिहावे लागत असे. अशा वेळी गीतकाराची कसोटी लागत असे. खेबुडकरांनी हे आव्हान लीलया उचलले व गीतामधील शब्द व भावनांचा तोलही ढळू दिला नाही. प्रेमगीतांमधील हळुवारपणा, लावणीतील सौंदर्य, भक्तिगीतांतील भक्तिरस, वगपटातील ग्रामीणबाज यामुळे त्यांचे शहरी, कौटुंबिक, धार्मिक, ग्रामीण कथांवरील आधारित चित्रपट प्रेक्षकांना भावले.
जगदीशांची गीते सर्वसमावेशक असत, त्यामध्ये बालगीतापासून प्रेमगीते, नांदी, पोवाडा, भक्तिगीते, अंगाई गीते, कीर्तन, वासुदेव, कोळीगीत, गण, गौळण, वग, नागोबाची-हादग्याची गाणी, भजन, सवाल-जवाब, झगडे, भूपाळी, भारूड, विराणी, मंगळागौरीची-हळदीची-लग्नाची गाणी, मोटेवरची गाणी, धनगराची गाणी, डोंबाऱ्याची गाणी, लेझीम, शेतकरी गीते असे अस्सल मराठी बाण्याचे प्रकार आहेत. ज्यावेळी त्यांनी चित्रगीत लिहायला घेतले त्यावेळी बहुतेक मराठी चित्रपट ग्रामीण पार्श्वभूमीचे असल्यामुळे त्यातील गाणी ग्रामीण जीवनाचे अंतरंग दर्शविणारी असत.”गण गवळण’ या चित्रपटासाठी त्यांनी सर्वात जास्त 19 गाणी लिहिली.”दुर्गा आली घरा’ या चित्रपटातील साडेतीन शक्तिपीठांचे वर्णन करणारे 120 ओळींचे 16 मिनिटं सर्वात जास्त वेळ चालणारं गीत त्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य आहे. “अष्टविनायका तुझा महिमा कसा’ या गाण्यातून त्यांनी अष्टविनायकाचे वर्णनासहित यथार्थ दर्शन घडविले.
“एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटासाठी 100 ओळींचा वग असाच गाजला. वर्ष 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या “साधी माणसं’ या चित्रपटातील “ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे’ गाण्याची गोष्ट अशीच रंजक आहे. यातील काही गाणी कवी योगेश यांनी लिहिली आहेत, तर एक गाणे संत कान्होपात्राचे आहे. भालजींचे एका गाण्यावर अडले, प्रसंगाला अनुरूप अशी रचना मनास पटेना, गीत लिहिताना “ऐरणीच्या देवा तुला अग्निफुले वाहू दे’ असे शब्द आले; पण ठिणगी व अग्निफुले याच्यात अर्थसाधर्म्य होते. अखेर भालजींनी खेबुडकरांना शाळेत फोन लावला. जेथे काम करायचे त्या शाळेतील सर्वांचे खेबुडकरांवर प्रेम होते. मुख्याध्यापकांनी वर्गावर असलेल्या खेबुडकरांना दुसरा शिक्षक पाठवून त्यांना भालजींचेकडे पाठविले. खेबुडकर भालजींना म्हणाले, “बाबा का बोलावलंय?’ भालजी म्हणाले, “अरे जगदीश, मी “साधी माणसं’ करतोय’. तेव्हा खेबुडकर त्यांना म्हणाले, “हो मला माहीत आहे, गीते योगेश यांची आहेत’. भालजी यावर म्हणाले, “हो पण एका गाण्यासाठी अडलंय.’
भालजींनी खेबुडकरांना साधी माणसं चित्रपटातली कथा ऐकवली. लोहारकाम करणारं जोडपं, नवऱ्याबद्दल तिच्या भावना, लोहारांचा देव, त्यांना वाहिली जाणारी फुलं असं काहीतरी भावनात्मक आलं पाहिजे, असं भालजी हे खेबुडकरांना सांगत होते.”गरिबीतसुद्धा त्यांना आनंद आहे, गाण्यात ते आलं पाहिजे, असं सांगून त्यांनी खेबुडकरांना सांगितलं. तेव्हा खेबुडकर म्हणाले, “बाबा तुम्ही कथा सांगत होते, तेव्हाच माझ्या डोक्यात ओळी लिहिल्या जात होत्या, माझ्याजवळ कागद नाहीयं कागद आणि पेन द्या.’ आणि अख्ख गाणंच लिहून काढलं. आज या गाण्याला 57 वर्षे झाली. त्यातील हलणारा भाता आणि ठिणगी तशीच आहे.
त्यांनी शांतारामबापूंच्या “पिंजरा’ या चित्रपटासाठी 110 गाणी लिहिली व त्यातील 11 गीते पडद्यावर आली. शांतारामबापूना पसंत येईपर्यंत ते गीत लिहीत होते. लावणी प्रकारातील तावूनसुलाखून निघालेली गाणी अजरामर झाली व अख्खा महाराष्ट्र पिंजऱ्यात बंद झाला. जगदीश खेबुडकर व राम कदम ही जोडी कमालीची यशस्वी झाली. “तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ हे कालिंगडा रागातील गाणे तसेच तोंडी रागातील “कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ तसेच शिवरंजनी रागातील “दिसला गं बाई दिसला’ तर पिलू रागातील “दे रे कान्हा चोळी अन् लुगडी’ अशी रचनात्मक विविधताही दिसून येते. कविवर्यांना भावपूर्ण आदरांजली.
माधव विद्वांस