देहूगाव, (वार्ताहर) – ‘कामाला का गेला नाही’ असे वडिलांनी बोलल्याने दारूच्या नशेत असणाऱ्या एका सत्तावीस वर्षीय तरुणाने इंद्रायणी नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना देहूगाव येथे घडली आहे. देहूतील मुख्य मंदिरापाठीमागे सोमवारी (दि. १८) पहाटे एकच्या सुमारास हा प्रकार घडला. शुभम सर्जेराव ओव्हाळ (वय २७. रा. चव्हाणनगर, देहूगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुभम याच्या वडिलांनी त्याला, तू कामाला का गेला नाहीस, यावरुन सुनावले. तेव्हा दारूच्या नशेत असणाऱ्या शुभम याने घराबाहेर येऊन दाराची कडी लावून घटनास्थळावरून पळ काढला आणि मुख्य मंदिराच्या मागे असणाऱ्या पान दरवाजा जवळील बुरुजावरून इंद्रायणी नदीपात्रामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी एनडीआरएफ च्या जवानांनी सकाळी दहाच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. स्थानिक पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.