नवी दिल्ली : इस्रायल-इराण युद्धावर भारताचे मौन केवळ आवाज गमावणेच नाही तर मूल्यांचे आत्मसमर्पणदेखील दर्शवते. पूर्वी भारत सरकार गाझामधील इस्रायली हल्ल्यावर मौन बाळगत होते आणि आता ते इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यानही असेच करत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले आहे. शनिवारी इस्रायल-इराण युद्धावर सोनियांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्यावरही टीका केली. सोनिया म्हणाल्या की, गाझामधील विध्वंसावर भारत सरकारचे मौन आणि आता इराणविरुद्ध विनाकारण वाढणारी कारवाई आपल्या नैतिक आणि राजनैतिक परंपरांपासून विचलित करणारे प्रत्यार्पण दर्शवते. हे केवळ आवाजाचे नुकसानच नाही तर मूल्यांचे समर्पण देखील आहे. सोनियांनी १३ जून रोजी इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा विशेषतः निषेध केला होता. त्याला सोनियांनी इराणच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन म्हटले होते. या प्रकरणावर भारताचे मौन त्याच्या ऐतिहासिक तटस्थतेविरुद्ध आणि शांततेचा पुरस्कार करणाऱ्या प्रतिमेविरुद्ध आहे, असे भाष्य त्यांनी केले. इराण आमचा मित्र आहे सोनिया गांधींनी इराणचे कौतुक केले आणि म्हटले की, हा देश भारताचा मित्र आहे. जम्मू आणि काश्मीरसह महत्त्वाच्या प्रसंगी भारताला सातत्याने पाठिंबा देण्याचा इराणचा इतिहास आहे. १९९४ मध्ये इराणने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगात काश्मीर मुद्द्यावर भारतावर टीका करणारा ठराव रोखण्यास मदत केली होती. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शांतता बिघडवण्याचा आणि अतिरेकीवादाला प्रोत्साहन देण्याचा दीर्घ आणि दुर्दैवी रेकॉर्ड आहे. नेतान्याहू यांनी संवादाऐवजी तणाव वाढवण्याचा पर्याय निवडला, हे आश्चर्यकारक नाही.