Songaon Garbage Fire – तब्बल चार दिवस वणव्याचे रौद्र रुप अनुभवत कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसल्यानंतर सातारा पालिकेला जाग आली आहे. इंदूरच्या इको सेव्ह या कंपनीचे संचालक पुनित शिसोदिया यांच्याविरोधात मानवी जीवितास धोका निर्माण करुन पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबत सातारा पालिकेचे आरोग्य निरीक्षक राकेश गलियल यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. सातारा शहरालगतच्या सात एकरांमध्ये पसरलेल्या कचऱ्याच्या ढिगांना वणवा लागून आगीचे तांडव आणि अपायकारक धुराचा सामना सोनगाव- जकातवाडीलगतच्या परिसरांना करावा लागला. गेल्या चार दिवसांपासून ही आग धुमसत असून अद्यापही ती विझलेली नाही. नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत यंत्रणेला सूचना दिल्या. तसेच आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी 48 तास सतत सोनगाव कचरा डेपोवर थांबून पुन्हा आग धुमसणार नाही याची काळजी घेतली आहे. या आगीमध्ये नऊ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले सोलर पॅनल तसेच कचरा वेचक संघाच्यावतीने फुलवण्यात आलेल्या बांबूच्या शेतीला सुद्धा त्याची झळ बसली. या आगीमध्ये सातारा पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. कचरा डेपोमधील वणव्याचे सत्राबाबतचा पाठपुरावा वृत्तांमधून लावून धरल्यामुळे पालिका प्रशासनावरील दबाव वाढला. नगरसेवक राजू गोरे यांनी सुद्धा संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक भूमिका घेतल्याने सरते शेवटी नगरपालिकेने कारवाईचे पाऊल उचलले. मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करून सातारा पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करण्याला जबाबदार धरुन इको सेव्ह प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक पुनित सिसोदिया यांच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सातारा तालुका पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रत्यक्ष कारवाई सुरु केली आहे. गलियाल यांची चौकशीही महत्त्वाची केवळ कंपनीच्या संचालकावर गुन्हे दाखल करून भागणार नाही तर त्यामध्ये सहभागी असणाऱ्या सातारा पालिकेच्या यंत्रणेची सुद्धा तटस्थ चौकशी झाली पाहिजे. करारामध्ये नियमाने अंतर्भूत असलेली मासिक बिले आणि प्रत्यक्ष आधार झालेली बिले यामध्ये तफावत असल्याची तक्रार आहे. बायोमायनिंग योग्य पद्धतीने होत नसताना गेल्या चार वर्षांत आरोग्य विभागाने ठेकेदार कंपनीला किती नोटिसा बजावल्या हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. कंपनीने ठेका दुसऱ्याला चालवायला दिला तेथे हरकत का घेण्यात आली नाही, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या विभागाचे प्रमुख आरोग्य निरीक्षक गलियाल यांची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरी शिवशरण यांनी केली आहे.