Nitesh Rane : “अशा कुठल्यातरी शेमड्या मुलांनी भाजपा आणि…”; आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणेंचा पलटवार
Nitesh Rane : नितेश राणे यांनी सोमवारी सिंधुदुर्ग येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

Nitesh Rane on Aaditya Thackeray : भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या बिहारमधील बांकीपूर पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी मोठा विजय मिळवला. त्यांच्या या विजयानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
या विजयावर उबाठा गटाचे नेते वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती. “देशात बदलाचं वारं वाहू लागलं आहे.” असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या प्रतिक्रियेवर भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी जोरदार पलटवार केला.
“ते तोंडावर आपटले होते. जनमताचा आम्ही आदर करतो. पश्चिम बंगालचा पण निकाल लागलाय. अशा कुठल्यातरी शेमड्या मुलांनी भाजपा आणि आमच्या वरिष्ठांना सांगू नये. तू तुझी वरळी सांभाळ. २०२९ ला तुझी नाडी सोडण्यात आम्ही सक्षम आहोत.” अशा खोचक शब्दांत पलटवार केला.
नितेश राणे यांनी सोमवारी सिंधुदुर्ग येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण तापणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
….मग आम्ही असं म्हणायचं का?
याशिवाय नितेश राणे यांनी बेस्ट निवडणुकीची आठवण करून देत ठाकरे बंधूंवर बोचरा वार केला. ते म्हणाले “एका पोटनिवडणुकीमुळे यांना एवढा आनंद होतो तर बेस्ट निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असताना पराभूत झाले मग मराठी माणसाने या लोकांच्या ढुंगणावर लाथ मारली. असं आम्ही म्हणायचं का?” अशा शब्दांत टोला लगावला.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांनी नीट पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता आम आदमी पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला असून सरकारविरोधात लाँग मार्चची हाक दिली आहे. यावर नितेश राणे यांनी भाष्य केलं.
“केजरीवाल मुख्यमंत्री राहिले आहेत तरी त्यांना पंतप्रधानांची सुरक्षा किती महत्वाची असते हे कळत नसेल तर त्यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते. केंद्र सरकार योग्य पद्धतीने हा विषय हाताळेल.” असं म्हणतं नितेश राणे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र डागले.
नेमकं काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
“देशात बदलाचं वारं वाहू लागलं आहे. गेल्या २०-२५ वर्षांत भाजप जिथे कधी हरली नव्हती, तिथेही आता हार पत्करावी लागत आहे.”






