Bihar Politics : 31 वर्ष भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघ निसटला; विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा विजय
Bihar Politics : बांकीपूर पोटनिवडणुकीत जनसुराजचे प्रमुख प्रशांत किशोर विजयी होत बिहार विधानसभेत पोहोचले. 31 वर्षांपासूनचा भाजपचा गड त्यांनी कसा जिंकला, कोणते मुद्दे निर्णायक ठरले आणि मतदारांचा कल कसा बदलला, जाणून घ्या.

Bihar Politics : बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी विजय मिळवत पक्षाला प्रथमच विधानसभेत प्रतिनिधित्व मिळवून दिले आहे. सलग 31 वर्षे भाजपच्या ताब्यात राहिलेल्या या मतदारसंघात झालेला हा निकाल राज्याच्या राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
विशेष म्हणजे, मागील विधानसभा निवडणुकीत जनसुराजने 238 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र त्यापैकी 236 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. त्यावेळी स्वतः प्रशांत किशोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते. मात्र बांकीपूर पोटनिवडणुकीत स्वतः उमेदवार म्हणून उतरून त्यांनी विजय मिळवला आणि आता ते जनसुराजचे विधानसभेतील एकमेव आमदार ठरले आहेत.
‘सायलेंट’ मतदारांनी बदलला निकाल –
या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या बाजूने बोलणारे समर्थक जरी स्पष्टपणे दिसत असले, तरी प्रत्यक्ष मतदानात शांत राहणाऱ्या मतदारांनीही त्यांना मोठी साथ दिल्याचे विश्लेषण केले जात आहे.
कमी मतदानामुळे भाजपला पारंपरिक ‘सायलेंट वोटर’ आपल्या बाजूने असल्याचा विश्वास होता. मात्र प्रत्यक्ष निकालात चित्र उलटे दिसले. भाजपचा काही पारंपरिक मतदारवर्ग विविध कारणांमुळे नाराज होता आणि त्यांनी शांतपणे जनसुराजला पसंती दिली.
त्याचबरोबर राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) मतदारांमध्येही नेतृत्वाबाबत नाराजी असल्याचे दिसून आले. तेजस्वी यादव यांच्यावरील असंतोषामुळे मुस्लिम आणि यादव मतदारांच्या एका वर्गानेही जनसुराजकडे कल दर्शवल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
भाजपविरोधी वातावरणाचा परिणाम?
या विजयामागे प्रशांत किशोर यांच्या प्रचाराइतकीच भाजपच्या रणनीतीतील त्रुटीही कारणीभूत ठरल्याचा दावा केला जात आहे.
एप्रिल 2026 मध्ये नीतीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून भाजपने त्यांच्याऐवजी स्वतःचा मुख्यमंत्री नेमल्याने काही मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्याचा परिणाम बांकीपूर पोटनिवडणुकीत दिसल्याचे बोलले जात आहे.
उमेदवार निवडीच्या प्रक्रियेतही भाजपवर टीका झाली. सुरुवातीला अभिषेक कुमार बंटी यांना उमेदवारी देण्यात आली, मात्र नंतर त्यांचा अर्ज मागे घेण्यात आला. त्यानंतर नीरज कुमार यांना उमेदवारी देण्यात आली. या बदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
याशिवाय यूजीसीशी संबंधित मुद्दे, ई-20 पेट्रोल, सीएनजी, पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती, तसेच NEET परीक्षा निकालातील कथित गोंधळामुळेही काही मतदारांमध्ये असंतोष वाढल्याचे विश्लेषण समोर आले आहे.
प्रचारादरम्यान भाजपने रोड शोवर अधिक भर दिला, तर मतदारांशी थेट संवाद साधण्यात अपेक्षित यश मिळाले नाही, अशीही चर्चा आहे.
प्रशांत किशोरांची वेगळी प्रचारशैली ठरली प्रभावी –
प्रशांत किशोर यांनी मोठ्या सभा आणि भव्य रोड शो याऐवजी घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला. विविध परिसरांमध्ये लहान बैठका आणि प्रत्यक्ष जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी मतदारांपर्यंत आपला संदेश पोहोचवला.
या प्रचारात त्यांनी नीतीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्यात आल्याचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला. हा संदेश विविध समाजघटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्याचे मानले जात आहे.
राजकीय विश्लेषणानुसार भूमिहार, ब्राह्मण यांच्यासह राजपूत आणि कायस्थ मतदारांच्या एका वर्गानेही जनसुराजकडे झुकाव दाखवला. भाजपचा पारंपरिक मतदार मानल्या जाणाऱ्या काही समाजघटकांमध्येही बदललेला कल या निकालातून स्पष्ट झाल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे.
बिहारच्या राजकारणासाठी महत्त्वाचा संदेश –
बांकीपूर पोटनिवडणुकीचा निकाल केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून बिहारच्या आगामी राजकीय समीकरणांसाठीही महत्त्वाचा संकेत मानला जात आहे. जनसुराजला विधानसभेत प्रथमच प्रतिनिधित्व मिळाल्याने प्रशांत किशोर यांची सक्रिय संसदीय राजकारणातील भूमिका अधिक ठळक झाली असून, भविष्यात राज्यातील प्रमुख पक्षांसमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार नितीन नवीन यांनी आमदारपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली. नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांना नंतर राज्यसभेवर पाठविण्यात आले, त्यामुळे त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर बांकीपूरमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली. नितीन नवीन यांनी 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत बांकीपूरमधून 51 हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.





