धाराशिव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळेच राहुल सोलापूरकरवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. राहुल सोलापूरकर हा मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या आणि त्यांच्या टोळीतला माणूस आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणारच नाही. मुख्यमंत्र्यांनी एक टोळी बनवलेली आहे. या टोळीत वकील देखील आहेत. काही मोघम अभ्यासक देखील आहेत. ते सर्व साहित्यिक म्हणून स्वतःचे नाव लावतात. सरकारच्या आशीर्वादामुळेच राहुल सोलापूरकरवर कारवाई झाली नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने धाराशिव जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. या निमित्ताने मराठा आंदोलक जरांगे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. धाराशिव जिल्ह्यामध्ये जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दुचाकी रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगेंनी राहुल सोलापूरकर यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर टीका केली.