Uddhav Thackeray : मविआच्या बैठकीला ‘इतक्या’ आमदारांनी मारली दांडी; बैठकीत उद्धव ठाकरे स्पष्टचं बोलले
Uddhav Thackeray : सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांना अपेक्षित आक्रमकता दाखवता आली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Uddhav Thackeray : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (मविआ) आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मविआच्या एकीबाबत थेट प्रश्न उपस्थित करत, “महाविकास आघाडी म्हणून आपण खरोखर एकत्र आहोत का?” अशी खंत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी केवळ सभागृहातच नव्हे, तर राज्यभरातील सभा, आंदोलने आणि जनसंपर्क कार्यक्रमांमध्येही तीनही पक्षांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज अधोरेखित केली. विरोधक म्हणून जनतेसमोर एकसंध भूमिका मांडणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
२३ आमदार गैरहजर
सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांना अपेक्षित आक्रमकता दाखवता आली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, मविआच्या 60 आमदारांपैकी केवळ 37 आमदार उपस्थित राहिले, तर 23 आमदार अनुपस्थित होते. यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत सारंकाही आलबेल आहे ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा : Samantha Ruth Prabhu: समंथाची गुडन्यूज! प्रेग्नन्सीची घोषणा करत म्हणाली; आता घेणार मॅटरनिटी ब्रेक
ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार शिंदे गटात गेल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे मविआच्या बैठकीत सहभागी झाले. या खासदारांच्या बंडखोरीचा मुद्दा बैठकीत चर्चेला आला नसल्याचे समजते. मात्र, मविआतील समन्वय आणि एकीबाबत त्यांनी स्पष्टपणे चिंता व्यक्त केली.
‘हे’ महत्वाचे नेते होते उपस्थित
या बैठकीला संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल परब, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, ज्योती गायकवाड आणि भास्कर जाधव यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि जयंत पाटील हे वैयक्तिक कारणांमुळे बैठकीस गैरहजर राहिल्याची माहिती देण्यात आली. तसेच इतर आमदार नेमक्या कोणत्या कारणामुळे गैहजर होते याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
ठाकरे गटांच्या नेत्यांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट
दरम्यान, ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या पक्षांतरप्रकरणीही घडामोडींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मशाल चिन्हावर निवडून आलेले हे खासदार ठाकरे गटाचेच असल्याचा दावा अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी अध्यक्षांसोबतच्या बैठकीत मांडला आहे.
कायद्यानुसार निर्णय होणार
यावर लोकसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत राहून न्याय्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे, सहा खासदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होत असल्याचे पत्रही अध्यक्षांकडे सादर केले आहे. त्यामुळे या प्रकरणात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भूमिका महत्वाची असणार आहे. कायद्यानुसार नियम काय सांगतो, यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






