Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर! शिवसेनेत प्रवेश करताच ओमराजेंना पहिला मोठा धक्का
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगाने आणि नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६ खासदारांनी अचानक बंडखोरी करत (Omraje Nimbalkar) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने राजकीय भूकंप झाला आहे.

Omraje Nimbalkar : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगाने आणि नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६ खासदारांनी अचानक बंडखोरी करत (Omraje Nimbalkar) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने राजकीय भूकंप झाला आहे.
मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करणे आणि त्यासाठी लागणारा शासकीय निधी मिळवणे, याच कारणासाठी आपण सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतला, अशी भूमिका या बंडखोर खासदारांनी मांडली आहे. या ६ खासदारांमध्ये धाराशिवचे अत्यंत लोकप्रिय आणि आक्रमक खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचाही समावेश आहे.
मतदारसंघाच्या हितासाठीच आपण उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचे ओमराजेंनी स्पष्ट केले असले, तरी आता त्यांच्या या निर्णयाला त्यांच्याच घरातून तीव्र विरोध झाला आहे. ओमराजे निंबाळकर यांचे लहान बंधू आणि माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी आता आपल्याच मोठ्या भावाविरोधात थेट राजकीय शिंग फुंकले असून, ओमराजेंची भूमिका आपल्याला अजिबात पटलेली नसल्याचे सांगत उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट मकरंदराजे निंबाळकर यांना फोन कॉल केल्याचे समोर आले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना मकरंदराजेंनी या फोन कॉलला दुजोरा दिला.
या संभाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी मकरंदराजेंना धाराशिव जिल्ह्यात शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्याचे आणि निष्ठावंतांची फळी उभारण्याचे थेट आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरेंच्या या फोननंतर आता मकरंदराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले असून, धाराशिवमधील ठाकरे गटाची संपूर्ण धुरा आता त्यांच्या खांद्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी शिवसेना सोडताना दिलेल्या कारणांवर मकरंदराजेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ओमराजेंनी पक्ष सोडण्यासाठी जी विकासकामांची आणि निधीची कारणे पुढे केली आहेत, ती मला वैयक्तिकरित्या अजिबात पटलेली नाहीत.
धाराशिव जिल्हा हा नेहमीच शिवसेना आणि ठाकरे परिवाराचा बालेकिल्ला राहिला आहे. कठीण काळातही आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आणि शिवसेनेसोबत पूर्णपणे एकनिष्ठ राहणार आहोत. हा बालेकिल्ला कोणत्याही परिस्थितीत शाबूत ठेवण्यासाठी आम्ही संपूर्ण ताकदीने मैदानात उतरू.” मकरंदराजेंच्या या रोखठोक भूमिकेमुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, ज्या खासदारांनी ऐनवेळी पक्षाची साथ सोडली, त्यांच्याच मतदारसंघात जाऊन थेट जनतेशी संवाद साधण्याचे उद्धव ठाकरेंनी ठरवले आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून येत्या २८ जून रोजी उद्धव ठाकरे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
मकरंदराजे निंबाळकर आणि त्यांचे सहकारी सध्या या दौऱ्याच्या जय्यत तयारीत व्यस्त आहेत. या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे हे मकरंदराजेंना धाराशिव जिल्ह्यात मोठी राजकीय ताकद आणि रसद पुरवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
जर असे झाले, तर आगामी काळात धाराशिवच्या राजकीय आखाड्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात त्यांचेच सख्खे लहान भाऊ मकरंदराजे निंबाळकर उभे ठाकतील. परिणामी, धाराशिव जिल्ह्यातील ही भावा-भावांमधील राजकीय लढाई संपूर्ण महाराष्ट्रात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.






