Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडकरांची सहा महिन्यांची पाण्याची चिंता मिटली; पवना धरण जूनमध्येच ५० टक्के भरले!

पिंपरी: यंदाच्या मान्सूनने पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा दिला असून, शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण आज (२४ जून) दुपारी बारा वाजेच्या सुमारास ५० टक्के भरले आहे. त्यामुळे शहरवासीयांची किमान सहा महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे.
दरवर्षी जुलै महिन्यात पवना धरण ५० टक्के भरते. तर साधारणतः १५ ऑगस्टच्या सुमारास धरण पूर्ण क्षमतेने भरते आणि त्यानंतर अधीकचे पाणी पवना नदीत सोडले जाते. यंदा लवकर म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस मान्सून राज्यात दाखल झाला. सध्या पवना धरण आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे यंदा जून महिन्यातच धरण ५० टक्के भरल्याने शहराच्या पाणीसाठ्याबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत.
धरणात पाणीसाठा वाढल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. विशेषतः वाढत्या लोकसंख्येसह औद्योगिक क्षेत्रातही यामुळे दिलासा मिळणार आहे. पावसाचे वेळेआधी झालेले आगमन आणि धरणातील पाणीसाठा ही शहरासाठी सकारात्मक बातमी असून, पुढील महिन्यांतील स्थिर पावसावर आता नजर ठेवली जात आहे.





