सायलेंट सेलचा एटीएसकडून पर्दाफाश ; अल कायदाशी संपर्कात असलेल्या झुबेरच्या तपासात महत्त्वाची माहिती उघड

प्रभात वॉच
पुणे ( संजय कडू ) – महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अल कायदा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या संगणक अभियंत्यास झुबेर हंगर्जीकर (३२, रा.कोंढवा) यास अटक केली होती. झुबेरने आपल्या मित्रांना प्रक्षोभक व ब्रेनवॉश करणारे साहित्य दिल्याचे तपासात उघड झाले असून, या सर्व मित्रांची कसून चौकशी सुरू आहे.झुबेरच्या अटकेवेळी त्याच्या एका साथीदारासही ताब्यात घेतले होते. झुबेरचा अल कायदा संघटनेशी संपर्कात होता, तसेच त्याच्याकडे काही आक्षेपार्ह साहित्यही (पुस्तके) सापडले आहे.
झुबेरचे मित्रही उच्चशक्षित आहेत. तो २०१९ पासून ज्या मित्रांच्या संपर्कात होता आणि ज्यांना त्याने साहित्य (पुस्तके) आणि मोबाइलवर टेक्स स्वरूपात साहित्य पाठवले, त्या सर्वांची चौकशी सुरू आहे. यासाठी सर्वांचे मोबाइल आणि लॅपटॉपही ताब्यात घेतले आहेत. झुबेरकडून इतरांचे ब्रेन वॉश केले असल्याची शक्यता एटीएसच्या सूत्रांनी व्यक्त केली.
जप्त उर्दू साहित्याचे विश्लेषण सुरू
एटीएसने कोंढवा आणि खडकमाळ अळी परिसरात टाकलेल्या नऊ छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य, पुस्तके, मोबाइल आणि लॅपटॉप जप्त केले. हे सर्व साहित्य झुबेरने पुरवल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या ताब्यात सापडलेले साहित्य उर्दू भाषेत असून, त्याचे भाषांतर आणि विश्लेषणाचे काम सुरू आहे.
ब्रेनवॉश नेटवर्कचा संशय
झुबेरकडून त्याच्या शिक्षित मित्रांचे ब्रेनवॉश केले जात असल्याचा संशय एटीएसच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. त्याने २०१९ पासून अनेक तरुणांशी संपर्क साधून मोबाइल टेक्स्ट व पुस्तकांच्या माध्यमातून धार्मिक आणि अतिरेकी विचारांचा प्रसार केल्याचे समोर आले आहे.
सखोल तपास सुरू
झुबेरला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याचा अल कायदाशी संपर्क कसा प्रस्थापित झाला, परराज्यातील साथीदार कोण आणि देशविघातक कारवाया कितपत पुढे गेल्या याचा तपास सुरू आहे. एटीएस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर शिक्षित तरुणांना गळाला लावणाऱ्या सायलेंट नेटवर्कचा भाग असू शकतो.
तर देशातील प्रमुख शहरांत धमाके?
या तपासाचा संबंध पूर्वीच्या आयसीस नेटवर्क प्रकरणाशी जोडला जात आहे. एटीएसने नऊ ऑक्टोबर रोजी कोंढवा, वानवडी, खडकी आणि इतर परिसरात मोठी छापेमारी करून १८ जणांना ताब्यात घेऊन १९ लॅपटॉप, मोबाइल आणि गुप्त दस्तऐवज जप्त केले होते. या प्रकरणात काही आरोपींनी मुंबई, पुणे, गुजरात आणि इतर शहरांत बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचे उघड झाले.
कोल्हापूर-सातारा जिल्ह्यांत जंगलात बॉम्बस्फोटांची चाचणी घेतल्याची माहितीही समोर आली आहे. या टोळीने चोरीच्या दुचाकींच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना लुटून मिळालेल्या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या ताब्यातून पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटो व व्हिडिओही पोलिसांनी जप्त केले आहेत.





