मुंबई : राज्यात दोन दिवसांपासून सुरु असलेला अनलॉकचा गोंधळ आज अखेर संपला आहे. राज्य सरकारकडून अनलॉकची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश शनिवारी मध्यरात्रीनंतर जारी करण्यात आले. नवीन आदेशानुसार सोमवारपासून पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात अनलॉक होणार आहे. दरम्यान, एकूण पाच स्तरांमध्ये विभागणी करतानाच जिल्ह्यांमध्ये प्रवासासंदर्भातील नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. खासगी गाड्या, टॅक्सी किंवा बसने लांबचा प्रवास करण्यासंदर्भातील नियमांमध्ये ही मोठा बदल करण्यात आला आहे.
वाचा ई पासचे नवे नियम
पहिला गटामध्ये येणाऱ्या जिल्ह्यामध्ये वाहतूकीसाठी परवानगी देण्यात आली असून त्यासाठी ई- पासची गरज पडणार नाही. मात्र पहिल्या गटात येणाऱ्या जिल्ह्यांमधून प्रवास करताना पाचव्या गटातील म्हणजेच संसर्गाचा धोका अधिक असणाऱ्या जिल्ह्यांमधून प्रवास करणार असल्यास ई- पासची गरज लागणार आहे.
दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या गटामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांनाही हाच नियम लागू आहे. संसर्गाचा धोका अधिक असलेल्या जिल्ह्यांमधून प्रवास करायचा असल्याच ई-पास आवश्यक असणार आहे. पाचव्या गटातील जिल्हे वगळता इतर गटातील जिल्ह्यांमध्ये प्रवासासाठी मूभा देण्यात आली आहे.
पाचव्या गटातील जिल्ह्यांमध्ये ई-पासची सक्ती कायम राहणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटामध्ये मोडतात. या जिल्ह्यांमधून बाहेर जाताना किंवा या जिल्ह्यांमध्ये येताना ई-पास आवश्यक असणार आहे.
या जिल्ह्यांमधून प्रवास करण्यासाठीही ई-पास लागणार आहे. जिल्ह्यातील व्यक्तींना बाहेर जाण्यासाठी काही विशेष कारणांसाठीच सवलत दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय कारणांसाठी किंवा अत्यावश्यक सेवेच्या कामासाठी प्रवास करण्यासाठी ई पास दिला जाईल.