Chhagan Bhujbal – सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अवघ्या राज्याचे वातावरण तापले असताना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या सहकारी नेत्यांना वादापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. महायुतीची मते वाढवता येत नसतील, तर आपल्या बोलण्याने कोणताही वाईट परिणाम होऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. भाजप आमदार नीतेश राणे यांनी नुकतेच अल्पसंख्यक समाजाविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या विधानाचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आरक्षणावर कथित वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा केली होती. त्यानंतर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींची जीभ छाटू नका, तर त्यांच्या जिभेला चटके द्या, असे विधान केले होते. या वादग्रस्त विधानांच्या मालिकेमुळे जनमाणसांत चुकीचा संदेश जातो. पर्यायाने निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची भीती असते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारीच महायुतीच्या नेत्यांना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला होता. संविधानाने प्रत्येकाला आपापली मते व विचार मांडण्याचा अधिकार दिला आहे. पण सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही वाचाळवीर नेत्यांनी वेडेवाकडे बोलून महायुतीच्या घटकपक्षांना अडचणीत आणण्याचे काम करू नये, असे अजित पवार म्हणाले होते. त्यांनी या प्रकरणी भाजप नेतृत्वाकडे तक्रार करण्याचाही इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी शुक्रवारी महायुतीच्या नेत्यांना वादग्रस्त विधाने करण्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ही तर सर्वांची इच्छा ! भुजबळ पुढे म्हणाले, महायुतीची सत्ता यावी ही अजित पवार, नीतेश राणे, नारायण राणे, माझी आदी सर्वांची इच्छा आहे. पण आपण बोलताना विचार करून बोलले पाहिजे. अनेक आमदार आहेत. त्यांना वेगवेगळ्या समाजाचे लोक मतदान करतात. या आमदारांच्या मतांत वाढ झाली पाहिजे. यासाठी त्यांच्या मतांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.