Gill Praises Suthar : “हा खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!”; मानव सुथारवर कर्णधार शुबमन गिल फिदा; केलं मोठं भाकीत
Gill Praises Suthar : कर्णधार शुबमन गिलने सामन्यात १० विकेट्स घेणारा युवा फिरकीपटू मानव सुथार आणि दोन्ही डावांत चमकणारा देवदत्त पडिक्कल यांचे तोंडभरून कौतुक केले.

Shubman Gill Praises Manav Suthar and Devdutt Padikkal after India Win : श्रीलंका दौऱ्यावरील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेचा १६५ धावांनी धुव्वा उडवला. या विजयानंतर भारतीय कर्णधार शुबमन गिलने (Shubman Gill) सामन्यात १० विकेट्स घेणारा युवा फिरकीपटू मानव सुथार आणि दोन्ही डावांत चमकणारा देवदत्त पडिक्कल यांचे तोंडभरून कौतुक केले. दुसऱ्या डावात ५५ धावांत ६ विकेट्स आणि सामन्यात एकूण १० विकेट्स घेणाऱ्या सुथारबद्दल बोलताना गिल म्हणाला, “सुथार अत्यंत प्रतिभावान खेळाडू असून तो दीर्घकाळ टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करेल.”
‘शतकानंतरही मोठी खेळी केली’; पडिक्कलचे कर्णधाराकडून कौतुक –
पहिल्या डावात १६७ आणि दुसऱ्या डावात ४४ धावा कुटत ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरलेल्या देवदत्त पडिक्कलचेही गिलने विशेष कौतुक केले. साई सुदर्शनच्या दुखापतीमुळे मिळालेल्या संधीवर बोलताना कर्णधार म्हणाला, “त्याला फलंदाजी करताना पाहणे अप्रतिम होते. केवळ शतक झळकावणे पुरेसे नसते, तर शतकानंतरही त्याने संयमाने मोठी खेळी साकारली. दोन्ही डावांत त्याने श्रीलंकन गोलंदाजांवर ज्या प्रकारे वर्चस्व गाजवले ते थक्क करणारे होते.”
पावसाचे सावट अन् डब्ल्यूटीसी फायनलचे ध्येय –
Magnificent Manav Suthar can serve India for a long time – Shubman Gill after SL vs IND 1st Test
He said:
“He has been bowling magnificently. Looks like a very promising guy and someone who can play for India for a long time.”
“He has magnificent to watch. Important to get… pic.twitter.com/eNy92QNNqf
— Cricket Hub (@Anurag9793) August 19, 2026
गॉल कसोटीत भारताचा विजय निश्चित होताच मैदानात मुसळधार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे वेळेत विजय मिळाल्याने भारतीय संघाने सुटकेचा निश्वास टाकला. गिलने सांगितले, “आम्ही चांगल्या स्थितीत होतो, परंतु हवामानाचा अंदाज पाहता सामना पूर्ण होईल की नाही याची खात्री नव्हती. अखेर विजय मिळाल्याने खूप समाधान वाटले.” या विजयामुळे भारताची डब्ल्यूटीसीमधील विजयाची टक्केवारी ५३.३३% झाली असून फायनल गाठणे हेच संघाचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे गिलने स्पष्ट केले.
नाणेफेकीने सामन्याचा खेळ बिघडवला; लंकन कर्णधाराची कबुली –
दुसरीकडे, पराभवानंतर श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्व्हाने नाणेफेकीने सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मान्य केले. डी सिल्व्हा म्हणाला, “भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली. आम्ही नियमित अंतराने विकेट्स गमावल्यामुळे सामन्यावरील पकड सुटली. गॉलच्या खेळपट्टीवर चौथ्या डावात फलंदाजी करणे सोपे नसते, तरीही आमच्या फलंदाजांनी दिलेली झुंज समाधानकारक होती.”





