संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात आल्या की संचेती हॉस्पिटलनंतर सर्वप्रथम नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता म्हणजेच फर्गसन कॉलेज रस्त्यावरील पूर्वीच्या विसाव्याच्या ठिकाणी आरती होते. यातील एक म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज पादुका चौकातील ज्ञानेश्वर महाराज मंदिर आणि दुसरे तुकाराम महाराज चौकातील तुकाराम महाराज मंदिर. ही दोन्ही मंदिरे देखील पुरातन आहेत.
हभप हैबतबाबा आरफळकर यांनी माऊलींचा स्वतंत्र पालखी सोहळा 1832 साली म्हणजे 191 वर्षांपूर्वी सुरू केला, तेव्हापासून संत ज्ञानेश्वर महाराज पादुका चौकात विसाव्यासाठी हा सोहळा दुपारी थांबत होता. सध्या, फक्त स्थलांतरीत मंदिरात आरतीची परंपरा सुरू ठेवण्यात आली आहे.
मंदिराचे स्थलांतर…
गोखले मार्ग संपूर्ण परिसर विकसित झाला आणि रस्ता रुंदीकरणाची वेळ आली. ही बाब अगदी अलीकडची आहे. साधारण 15 वर्षांपूर्वीची. यावेळी हे मंदिर चौकातून दूर करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न झाले. मात्र, त्यावेळी सर्व वारकरी संप्रदायातील मान्यवर आणि या परिसरातील प्रतिष्ठितांनी मंदिर स्थलांतराला आक्षेप घेतला, शासकीय निर्णयाला विरोध केला. मोठ्या प्रमाणावर येथील चौकात आंदोलन झाले.
मात्र, तत्कालीन पालक मंत्री अजीत पवार यांनी पाटबंधारे खात्याच्या जागेत नवीन मंदिर बांधून देण्यास तयारी दर्शविल्यानंतर तत्कालीन आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मंदिराचे तत्कालीन मुख्य विश्वस्त कै. दत्तात्रेय नामदेवराव जगताप व इतर विश्वस्थांचा विरोध डावलून मंदिराची जागा रस्ता रुंदीकरणाला देण्यास मान्यता दिली आणि त्यानंतर पुणे महापालिकेने 2007 मध्ये सध्याचे मंदिर बांधून दिले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक परिसर 1832 मध्ये घनदाट झाडींनी व्यापलेला होता. इतका की सूर्यप्रकाशही दिसत नसे. यामुळे दुपारच्या वेळी सोहळा इथे आला की दुपारचे जेवण व विश्रांती यासाठी येथील वडबनाच्या थंडाव्यात थाबंत असे. दुपारच्यावेळी बैलगाड्या येथे सोडल्या जायच्या. येथील जागाही भरपूर होती आणि वाहनांची वर्दळही नव्हती, दुपारी चार वाजता विसावा संपला की आरती होत असे आणि पालखी पुढे मार्गस्थ होत असे. यातून चौकाला ज्ञानेश्वर पादुका चौक हे नाव नंतर दिले गेले.
येथे त्यावेळी एक चौथरा होता. त्यावर पादुका विसाव्यासाठी ठेवल्या जायच्या. नंतरच्या काळात तत्कालीन ग्रामस्थ कै. द. ना. जगताप, रघुनाथराव शेळके, बबनराव क्षीरसागर, दत्ता निकम, महादेव रेणुसे, रघुनाथ खोले आदींनी पत्र्याच्या शेडमध्ये साधारण 150 वर्षांपूर्वी माऊलीच्या मंदिराची स्थापना केली. मंदिरात सांप्रदायिक सर्व नित्योपचार सुरू केले. सध्या, हे मंदिर चौकातून थोडे आतील बाजूस असून सुंदर आधुनिक पद्धतीने घडवलेले आहे. मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती सुबक आणि हसऱ्या आहेत.
पुढे ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती असून व पादुकाही आहेत. मुख्य म्हणजे अगदी बाहेरूनही या मूर्तींचे दर्शन होते. मंदिर परिसर त्या मानाने विस्तीर्ण आहे. खऱ्या अर्थाने मंदिर जुने असले तरी मुख्य चौकातून ते स्थलांतरित करण्यात आल्यानंतर भव्य दिव्य झाले आहे. सध्या, मंदिराचे मुख्य विश्वस्त बापूसाहेब जगताप हे असून अरुण निम्हण, महेश क्षीरसागर, संदीप काळे, दिलीप शेळके, अमेय जगताप यांच्यासह मंदीराचे व्यवस्थापन पाहत आहेत. विलास शिंदे हे सेवेकरी आहेत, तर संदीप महाराज सकपाळ हे विणेकरी आहेत.
मंदिर एका रात्रीत दूर केले…
चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावून हे जुन्या मंदिराची वास्तू एका रात्रीत पाडून रात्रीच्या रात्री डांबर टाकून येथे रस्ता करण्यात आला. जुन्या मंदीराची वास्तू पाडल्यानंतर पुढील शासकीय अधिकाऱ्यांपासून ते राजकारण्यांचे सहकार्य लाभले.
पालखी येण्यास संध्याकाळ
नवे मंदिर मुख्य चौकापासून आतील बाजूस असल्याने आता 2008 पासून येथे केवळ आरती केली जाते आणि सोहळा पुढे मार्गस्थ होतो. मुख्य म्हणजे आता येथे पालखी येण्यास संध्याकाळ होऊन जाते. तसेच वाहनांची प्रचंड गर्दीमुळे सध्या हे विसाव्याचे ठिकाणही राहिलेले नाही. पण, पुण्यात पालख्या आल्या की, येथे आरती झाल्यावर पालख्या पुढे मार्गस्थ होतात व दोन्ही पालख्यांचे रात्रीचे मुक्काम पुण्यात होतात.