Burning Bus in Ahilyanagar : धक्कादायक ! अहिल्यानगरमध्ये 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटीने घेतला पेट

अहिल्यानगर : अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये अहिल्यानगर-मिरज रस्त्यावर एका धावत्या बसने पेट घेतला आहे.ही बस जवळपास 40 प्रवाशांना घेऊन नाशिकवरून सोलापूरच्या दिशेनं जात होती. यादरम्यान अचानक एसटीच्या बॅटरीमधून धूर निघायला सुरुवात झाली. काही वेळानंतर बसने मोठा पेट घेतला. या दुर्घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली.
काय घडले नेमके?
अपघातग्रस्त झालेली बस आज सकाळी सहा वाजता नाशिकवरून सोलापूरच्या दिशेनं निघाली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव बसस्थानकापर्यंत येईपर्यंत ही बस सुस्थितीत होती. मात्र मिरजगाव बसस्थानकावरून ही बस निघाल्यानंतर अवघ्या ५०० मिटर अंतरावर बसच्या बॅटरीमधून धूर निघू लागला. यानंतर धूर नेमका कुठून निघतोय, हे पाहण्यासाठी चालकाने रस्त्याच्या कडेला बस थांबवली.
त्यांनतर त्यांनी खाली उतरून बस तपासली असता, इंजिनच्या बाजुने बसने पेट घेतल्याचं चालकाच्या लक्षात आलं. यानंतर प्रसंगावधान दाखवत चालक आणि वाहकांनी तातडीने प्रवाशांना खाली उतरवलं. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाच्या प्रसंगावधानामुळे गाडीतून प्रवास करणारे 40 प्रवासी सुखरुप बचावले आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.





