सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात विजेचा धक्का लागून दोन जणांचा आणि पाण्यात बुडून एका 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याच्या दोन धक्कादायक घटनांनी शोककळा पसरली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला, तर नई जिंदगी परिसरातील देसाईनगर येथे पावसामुळे साचलेल्या पाण्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनांनी जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. हत्तूर येथे विजेच्या धक्क्याने दोघांचा बळी – हत्तूर गावात शुक्रवारी (दि. 8 ऑगस्ट) शेतीच्या कामादरम्यान घडलेल्या अपघातात बसवराज शिवानंद पाटील (वय 34) आणि रविकांत धोंडप्पा नाईकवाडे (वय 37) या दोघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, दोघेही शेतात ट्रॅक्टरवर काम करत असताना ट्रॅक्टरला जोडलेला लोखंडी पाईप वीजवाहक तारेला स्पर्शला. यामुळे ट्रॅक्टरमध्ये करंट उतरला आणि दोघेही जागीच बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले असून, या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे, सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. पाण्यात बुडून 9 वर्षीय मुलाचा मृत्यू – दुसरीकडे, सोलापुरातील नई जिंदगी परिसरातील देसाईनगर येथे पावसामुळे साचलेल्या पाण्यात बुडून 9 वर्षीय आहिल उस्मान शेख या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 8 ऑगस्ट) दुपारी उघडकीस आली. आहिल गुरुवारी सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडला होता, मात्र तो घरी परतला नाही. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी त्याचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास देसाईनगर येथील एका प्लॉटिंग परिसरातील ड्रेनेजच्या मेनहोलजवळ साचलेल्या पाण्यात त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आहिलला सिव्हिल रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.