Shivaji Maharaj statue collapse : ‘शिवरायांचा पुतळा तयार करण्यासाठी वापरले गंजलेले साहित्य’; पोलीस चौकशीत जयदीप म्हणाला…

Shivaji Maharaj statue collapsed : सिंधुदुर्गातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी 26 ऑगस्ट रोजी कोसळला. नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. हा पुतळा 28 फुटांचा असून त्याचे ब्राँझ धातूने बांधकाम करण्यात आले होते.
मात्र, पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं. मात्र आता या प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे.
पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटेची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान एक खळबळजनक गोष्ट समोर आली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात गंजलेल्या साहित्याचा वापर करण्यात आला होता, असा दावा सिंधुदुर्ग पोलिसांनी न्यायालयात केला आहे.
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर त्याचे अवशेष जमा करण्यात आले होते. ते गंजलेले होते. पुतळा तयार करताना वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे होते का? याचा तपास करावा लागेल, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. आता पोलिसांच्या पुढच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते पुतळ्याचे अनावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 35 पुतळी फुट्याचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या आठ महिन्यांत हा पुतळा कोसळल्याने त्याची बांधणी निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे.
या पुतळ्याला काही दिवसांपूर्वी गंज लागला होता. ही बाब लक्षात येताच सार्वजनिक बांधकाम खात्याने पत्र लिहून ही गोष्ट नौदलाला कळवली होती. मात्र, त्यानंतर नौदलाकडून योग्य ती कार्यवाही झाली नाही आणि शिवाजी महाराजांचा हा पुतळा मुळापासून कोसळण्याचा दुर्दैवी प्रकार घडला.





