मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांनी औरंगजेबाची कबर काढून टाकण्याचा इशारा दिला तसेच बाबरीची पुनरावृत्ती होईल असा गंभीर इशारा त्यांनी दिला होता. यापार्श्वभूमीवर सरकारने औरंगजेबच्या कबरीवर सुरक्षा वाढवली आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हलवली नाही तर बाबरीची पुनरावृत्ती करू, असा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याआधी देखील त्यांच्यावर सडकून टीका केली. यांना महाराष्ट्र जाळून टाकायचा आहे, त्यामुळे हे सर्व चालत आहे. रावणाला बाजूला करून रामायण सांगता येईल का, अफजल खान बाजूला करून प्रतापगडाची लढाई सांगता येईल का, हिटलरला बाजूला करून दुसरे विश्व युद्ध सांगता येईल का, असे प्रश्न आव्हाड यांनी विचारले आहेत. या सर्व गोष्टीला सरकारचा देखील एक छुपा पाठिंबा आहे, असा आरोप देखील त्यांनी सरकारवर केला होता. औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची म्हणजे काय करायचं? महाराष्ट्राचीच ही माती आहे. सौंदर्यीकरण हा विषय वेगळा आहे. एकदाची ती कबर उखडा. दररोज तेच तेच बोललं जातंय. इथे हजारो विषय पेंडींग असताना केवळ औरंगजेबवर बोललं जातंय इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही. औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. औरंगजेबाचा चबुतरा हटवा; बजरंग दलाची मागणी सरकारनं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर बुलडोझर फिरवून त्याच्या सर्व आठवणी पुसून टाकाव्यात, अशी मागणी होत आहे. अशातच आता अहिल्यानगरमध्ये अस्तित्वात असलेला औरंगजेबाचा चबुतराही हटवण्यात यावा, अशी मागणी बजरंग दलाचे संयोजक विवेक कुलकर्णी यांनी केली आहे. अहिल्यानगर शहरात औरंगजेबाचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला, तिथे आलमगीर नावाने एक वसाहत आहे. आलमगीर परिसरात औरंगजेबाला शेवटची आंघोळ घातली, तो चबुतरा अजूनही अस्तित्वात आहे. तो चबुतरा हटवावा, अशी मागणी विवेक कुलकर्णींनी केली. कबर खोदून तुम्हाला काय मिळणार : विजय वडेट्टीवार औरंगजेबाची कबर खोदण्याच्या आधी तुम्ही जी पापं केली आहेत त्याकडे पाहा. ४०० वर्षापूर्वीच्या कबरीवर राजकारण करणं आणि इतिहास मोडून तोडून सांगणे, सणांमध्ये एकमेकांमध्ये भांडणे लावून देणे यासारख्या गोष्टी आता सामान्य झाल्या आहेत. या लोकांना महाराष्ट्रातल्या जनतेला शांततेने जगू द्यायचे नाही. राज्य नेहमीच अस्थिर ठेवण्याचे काम केले जात आहे. औरंगजेब २७ वर्षे येथे होता तेव्हा तो महाराष्ट्राचे काहीही बिघडवू शकला नाही. आता त्याच्या मृत्यूनंतर त्याची कबर खोदून तुम्हाला काय मिळणार आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.