Shirur Bazar Samiti Election: महायुतीत मोठी फूट? भाजप आणि शरद पवार गट एकत्र; अधिकृत पॅनलची धाकधूक वाढली
Shirur Bazar Samiti Election: उमेदवारी वाटपामुळे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत महायुतीत मोठी फूट; तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप.

Shirur Bazar Samiti Election – शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीने यंदा राजकीय रंग चांगलाच चढला असून, उमेदवारी वाटपामुळे महायुतीत मोठी फूट पडल्याचे चित्र समोर येत आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलत राजकीय तडजोडी आणि अंतर्गत समीकरणांना प्राधान्य दिल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला असून, नाराजीचे रुप आता थेट बंडखोरीत बदलल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे, भाजपच्या निष्ठावंत समर्थकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात आल्याची तालुकाभर दबक्या आवाजात चर्चा रंगली आहे. एवढेच नव्हे तर दोन्ही पक्षांतील अनेक कट्टर, जुन्या आणि संघर्षशील कार्यकर्त्यांची उमेदवारी ऐनवेळी कापण्यात आल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत.
याच नाराजीतून आता मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजपचे अनेक जुने कार्यकर्ते आणि शरद पवार गटातील नेत्यांनी एकत्र येत स्वतंत्र पॅनल उभे केले असून, अधिकृत महायुतीच्या पॅनललाच थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक आता विरोधकांविरुद्ध कमी आणि महायुतीतील अंतर्गत संघर्षाची जास्त ठरणार असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे राजकीय वर्तुळात “पक्षासाठी आयुष्य झिजवणाऱ्यांची किंमत शून्य झाली का, असा संतप्त सूर उमटला आहे. शिरुर बाजार समितीची निवडणूक आता केवळ जागांची राहिलेली नसून, पक्षनिष्ठा विरुद्ध राजकीय तडजोड, कार्यकर्ते विरुद्ध गटबाजी आणि स्वाभिमान विरुद्ध सत्तेचे गणित यांची लढाई ठरणार का, याची उत्सुकता संपूर्ण तालुक्याला लागली आहे.
मतदार कोणाला धडा शिकवणार
निष्ठा, त्याग आणि संघर्षापेक्षा राजकीय सोय आणि गटबाजीच महत्त्वाची ठरली का, अशी चर्चा सुरु आहे. उमेदवारीच्या निर्णयामुळे अनेक कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांविरोधात काम करण्याचीही चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे, बाजार समितीसारख्या शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या संस्थेच्या निवडणुकीत पक्षनिष्ठेपेक्षा राजकीय व्यवहार, गटबाजी, अंतर्गत तडजोडीच अधिक प्रभावी ठरत असल्याची भावना तळागाळात व्यक्त होत आहे. त्यामुळे मतदारही कोणाला धडा शिकवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुप्त नाराजी मतपेटीतून उमटणार?
आता निवडणुकीत खरी लढत विरोधकांशी नसून महायुतीच्या अधिकृत पॅनल आणि नाराजांच्या बंडखोर पॅनलमध्ये रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी वाटपातून सुप्त नाराजी मतदानाच्या दिवशी मतपेटीत उतरली, तर त्याचा मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.





