लोकसभेत मताधिक्क्य मिळाल्याने विधानसभेला ताकद वाढणार
उरुळी कांचन-लोकसभेसाठी शिरुर-हवेली हा मतदारसंघ पूर्वी शिवसेनेचा बालकिल्ला होता. पण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत येथे प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेसने माजी मारल्याने भाजपच्या आमदाराला धक्का बसला. शिरूर हा मतदार संघ विधानसभेच्या पाठीमागील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालकिल्ला होता. तर भाजपची लाट आल्यावर या मतदार संघातून भाजपचे आमदार निवडून आले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे विजयी झाल्याने पुन्हा या मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढली आहे.
या भागातून आपणच विजयी होणार म्हणून उमेदवारी मिळवण्यासाठी शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून तिकीट मिळविण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे अशोक पवार यांच्या पत्नी तसेच प्रदीप कंद यांच्या पत्नी सध्या गावोगावी प्रचार करण्यास किंवा भेटागाटी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात धावपळ करीत आहेत.
शिरुर-हवेली मतदारसंघातून यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अशोक पवार निवडून आले; परंतु मागील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या लाटेत व नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या वचनामुळे या भागातून भाजपचे आमदार बाबूराव पाचर्णे हे निवडून आले; मात्र आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे विजयी झाल्याने पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढली आहे. पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार विजयी होईल या आशेने व आपल्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तिकिट मिळणार म्हणून माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या पत्नी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क साधत आहेत.
- तिकीट मिळेलही, पण प्रश्न सुटणार का?
तिकीट मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार. पण या भागातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी कोणीही प्रयत्न केलेले नाही. हे आता दिसून येऊ लागले आहे. तसेच उरुळी-कांचन येथील एलाईट चौक ते तळवाडी चौकातील उड्डाणपूल, कोरेगाव मूळ येथील उड्डाणपुलासारखे प्रश्न सोडविता आले नाही. याकडेही मतदारांनी लक्ष वेधले आहे.