मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्यावर 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करत प्रसिद्ध उद्योगपती दिपक कोठारी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत शिल्पा आणि राज यांना लूकआऊट नोटीस जारी केली आहे. तक्रारीमध्ये काय म्हंटले ? लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक दिपक कोठारी यांनी तक्रारीत नमूद केले की, सुमारे दहा वर्षांपूर्वी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी त्यांच्याकडून व्यवसाय वाढवण्याच्या नावाखाली 60 कोटी रुपये घेतले. दोन हप्त्यांमध्ये ही रक्कम घेतल्यानंतर या जोडप्याने व्यवसाय वाढवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत आणि पैसे वैयक्तिक वापरासाठी खर्च केल्याचा आरोप कोठारी यांनी केला. नेमका वाद काय आहे? कोठारी यांनी सांगितले की, 2015 मध्ये शिल्पा आणि राज यांनी मध्यस्थामार्फत त्यांच्याशी संपर्क साधला आणि बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या लाइफस्टाइल उत्पादने आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मसाठी 75 कोटींच्या कर्जाबाबत चर्चा केली. या कर्जासाठी 12 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला. नंतर शिल्पा आणि राज यांनी कर्जाचे गुंतवणुकीत रूपांतर करण्याची विनंती केली आणि व्याजासह मुद्दल परत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, कोठारी यांनी एप्रिल 2015 मध्ये शेअर सब्स्क्रिप्शन कराराद्वारे 31.95 कोटी रुपये, तर सप्टेंबर 2015 मध्ये सप्लिमेंट कराराद्वारे 28.53 कोटी रुपये बेस्ट डील टीव्हीच्या बँक खात्यात हस्तांतरित केले. आश्वासनांचा भंग कोठारी यांच्या मते, शिल्पा आणि राज यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही आणि पैसे परत केले नाहीत. अनेक प्रयत्न करूनही रक्कम परत मिळाली नाही. कोठारी यांनी या जोडप्यावर फंडाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला असून, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे या प्रकरणाने बॉलिवूड आणि व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.