Sharad Pawar | Sanjay Raut | खासदार संजय राऊत त्यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकामुळे चर्चेत आहेत. या पुस्तकात त्यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. केंद्र सरकारने दहशतवाद विरोधात जागतिक पटलावर देशाची भूमिका मांडण्यासाठी शिष्टमंडळ तयार केले आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही खासदार नसल्याने संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. तसेच या पुस्तकाविषयी बोलताना राऊत यांनी जेव्हा पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते, त्यावेळी संयुक्त राष्ट्र संघामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे शिष्टमंडळ गेले होते. त्या शिष्टमंडळातील एक सदस्य मीही होतो. हे जसे नरसिंहराव यांच्या काळामध्ये झाले, तसेच आजही होत आहे, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये पक्षीय भूमिका आणू नयेत, असे म्हणत संजय यांच्या विधानावर कानउघडणी केली आहे. बारामती येथील गोविंद बाग निवासस्थानी सोमवारी( दि. १९) शरद पवार आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नेमकं काय म्हणाले शरद पवार? हा निर्णय पक्षीय स्वरूपाचा नसतो. केंद्र सरकारने आठ ते नऊ शिष्टमंडळे सध्या तयार केली आहेत. संबंधित देशांमध्ये जाऊन त्यांना भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका मांडायची आहे. संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. एका शिष्टमंडळामध्ये त्यांच्या पक्षाची एक महिला सदस्यदेखील आहे, असे मला दिसते. त्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये आपल्या पक्षीय भूमिका आणू नयेत.